खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उन्हामुळे आणि सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला. खारघर दुर्घटनेचे ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आहेत त्यावरुन याठिकाणी १४ पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत. त्यांचा प्रशासन आणि पोलिसांवर दबाव आहे, खरे आकडे सांगू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत २० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि इतर यंत्रणांना फक्त सहा ते सात मृत्यूच झाले, असे सांगण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, श्री सेवकांच्या नातेवाईकांमुळे बाकीचे मृत्यू समोर आले. फक्त उष्माघाताने लोकांचे मृत्यू झालेले नाहीत. त्याठिकाणी पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जात होते. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीसाठी सरकार जबाबदार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
या सगळ्याविषयी सरकारी पक्षाकडून साधी संवेदना व्यक्त होत नाही. ही दुर्घटना घडताना देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असते तर त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुनच ते त्याठिकाणहून बाहेर पडले असते. आज ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, म्हणून त्यांची जबाबदारी संपत नाही, उलट ती वाढलेली आहे. भाजप पक्ष विरोधी बाकांवर असता तर त्यांनीही या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असती, असेही संजय राऊत यांनी म्हटले.