• Tue. Sep 8th, 2026

Ahilyanagar News : भाऊच बनला शत्रू, शेतातून कांदा आणला म्हणून बहिणीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये शरमेने मान खाली घालणारी घटना

शेतातील कांदा आणला म्हणून भाऊ संतापल्याची घटना कर्जत तालुक्यातील राखसवाडी येथे घडली आहे. संतापलेल्या भावाने बहिणीच्या घरात घुसून कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : शेतातील कांदा आणल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने बहिणीशी वाद घालत तिला मारहाण केली. त्यानंतर दोन दिवसांनी बहिणी, त्यांचा मुलगा आणि नातेवाईक घरात असताना पुन्हा वाद उफाळून आला आणि लाठ्या-काठ्या तसेच कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने महिलांसह नातेवाईकांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील राखसवाडी खुर्द येथे घडला.

मारहाणीत महिलांना दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तुम्ही येथून निघून जा, पुन्हा येथे आलात तर जीवे मारून टाकू, अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अलका भाऊसाहेब चोरमले (वय ५०, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा; हल्ली रा. राखसवाडी खुर्द) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रामदास पिंगळे, रखमाजी विठ्ठल रुपनर, राहुल पिंगळे, आबा पिंगळे, बिरा बापू कोळपे आणि रुपाली रुपनर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांद्यावरून सुरू झाला वाद

फिर्यादीनुसार, अलका चोरमले या पतीच्या निधनानंतर मागील काही वर्षांपासून राखसवाडी खुर्द येथे आई-वडिलांकडे राहत आहेत. त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाऊ रखमाजी विठ्ठल रुपनर हा कुटुंबासह शेजारी राहतो. ४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे दहा वाजता रखमाजी हा अलका यांच्या घरी आला. तू माझ्या वावरातील कांदे का आणलेस? असा जाब विचारत त्याने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच तू येथे राहायचे नाही, येथून निघून जा असे सांगून तो निघून गेला.

Maharashtra TimesRadha Patil : दहीहंडीचा कार्यक्रम राधा पाटीलच्या अंगाशी, नृत्यांगनेवर गुन्हा दाखल; काय घडलं?या प्रकाराची माहिती अलका यांनी आपल्या बहिणी, मुलगा आणि मेव्हण्याला फोनवरून दिली. ६ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास अलका यांना भेटण्यासाठी त्यांच्या बहिणी राधा किसन आखाडे, आशा रामचंद्र गोरे आणि मुलगा विकास भाऊसाहेब चोरमले हे घरी आले होते. याचवेळी रामदास पिंगळे तिथे आला आणि शिवीगाळ करू लागला. त्याला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने राधा यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर रखमाजी रुपनर याने आशा यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने पाठीत मारहाण केल्याचा आरोप आहे. राहुल पिंगळे याने नंदिनी हिला लाकडी काठीने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

महिलांसह मुलालाही मारहाण

आबा पिंगळे आणि बिरा बापू कोळपे यांनी महिलांसह विकास चोरमले यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी अलका यांचे चुलते आबा कृष्णा रुपनर आणि चुलती सुमलबाई मध्ये आले असता, रामदास पिंगळे याने आबा यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरातील वातावरण अक्षरशः तणावपूर्ण झाले. महिलांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

पुन्हा येथे आलात तर जीवे मारू अशी दिली धमकी

मारहाणीचा प्रकार सुरू असतानाच रुपाली रुपनर हिने तुम्ही येथून चालते व्हा, तुम्ही जर परत येथे आलात तर तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. कांदा आणण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाण, घरात घुसून हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने राखसवाडी खुर्दमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहेत.