Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे.
एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश
या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून यामध्ये दोन सख्खी भाऊ आणि त्यांच्या पत्नी देराणी जेठानी आहेत. गुजरातमधील व्यारा येथून महाजन कुटुंब कारने अमळनेर येथे राहणाऱ्या भाच्याच्या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी निघाले होते. अंमळनेर अवघ्या पाच किलोमीटर अंतर अर्थात दहा मिनिटाच्या प्रवास बाकी होता महाजन कुटुंबालाही काय माहित नव्हते की रस्त्यात इतकी दुर्दैवी घटना घडेल.
धुळ्याकडून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव बलेनो कारने सुरुवातीला समोर चालणाऱ्या दुचाकी ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी थेट हवेत उडून अंमळनेर डेपोच्या समोरून येणारे एसटी बसवर जाऊन आदळली. त्यानंतर कार थेट विरुद्ध दिशेने येणारा एसटी बसला जाऊन धडकली. अपघातात कार पूर्णपणे चक्काचूर झाली. कारमधील चार जण आणि दुचाकी वरील दोन जण असे एकूण सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामध्ये सुरेश विक्रम महाजन, अनिता सुरेश महाजन, नंदलाल गोपाल महाजन ,निर्मलाबाई नंदलाल महाजन आणि दुचाकी वरील निलेश सुखदेव तावडे (वय २५) आणि फाल्गुनी एकनाथ भोई(२७) यांचा समावेश आहे.
बसमधील प्रवासी सुरक्षित
घटनेनंतर अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ३५ प्रवासी असल्याची माहिती समोर आली. कार बसला धडकल्यानंतर बसचालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता.
बसचालकाने सांगितले कारण
अपघाताच्या वेळी नेमके काय घडले याबाबत बसचालकाने माहिती दिली. कारचालक झोपेत डुलक्या देत असल्यामुळे हा अपघात झाला, असा दावा त्याने केला आहे. “कारचालक झोपेत होता. त्याला मी हॉर्न दिला, लाईट ऑफ-डिपरही केले. मात्र त्यानंतर कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवले आणि नंतर बसवर येऊन धडक दिली,” अशी माहिती बसचालकाने दिली.
“कार बसवर धडकल्यानंतर मी वेळीच नियंत्रण मिळवले. बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली,” असेही बसचालकाने सांगितले. या दुर्दैवी अपघातानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही होत आहे.
वाहतूक करताना नियमांचे पालन करणे गरजेचे
दरम्यान, वाहन चालवताना झोप येत असल्यास गाडी थांबवून काही वेळ विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात.
