• Sat. Jun 13th, 2026
    10 जूनपासून अख्खा महाराष्ट्र भिजणार, 30 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार, IMDचा नवा अलर्ट, पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

    Rain Alert Maharashtra: उकाड्याने हैरान असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आता खुशखबर आली आहे. ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उकाडा, आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना आता हवामानात मोठा बदल अनुभवायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    ३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

    हवामान विभागाने ९-१० जून रोजी राज्यातील ३० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

    या भागांमध्ये काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

    चार दिवस पावसाची शक्यता

    पावसाचा हा प्रभाव केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. १० ते १३ जूनदरम्यान मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मालिका कायम राहू शकते. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याने काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    नाशिक आणि अहमदनगरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, पाऊस पडूनही विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेत फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नसून तापमान ४० अंशांच्या पुढेच राहू शकते.

    पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

    राज्यात मान्सूनपूर्व हालचाली वाढल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. सर्वत्र समाधानकारक आणि सलग पाऊस झाल्यानंतरच खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, सध्या मराठवाड्यातील वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. मात्र, १२ ते १८ जूनदरम्यान मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापण्याची शक्यता आहे.

    विजांच्या कडाडताना खबरदारी घ्या

    हवामान विभागाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात किंवा मोकळ्या मैदानात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा कच्च्या शेडमध्ये आश्रय घेऊ नये, कारण अशा ठिकाणी वीज पडण्याचा धोका अधिक असतो.

    विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील विजेची उपकरणे प्लगमधून काढून ठेवावीत. तसेच नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांमध्ये असलेल्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा