शहरासह विदर्भात गुरुवारीही उष्णतेची तीव्र लाट कायम राहिली. अनेक जिल्ह्यांतील कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. नागपुरात कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर वर्धा येथे ४६.८ अंश सेल्सिअससह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दुपारच्या सुमारास शहर अक्षरशः तापले होते. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, संध्याकाळी शहरात झालेल्या पावसामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला, तो काही वेळच टिकला.
Weather Update : उष्णतेच्या झळा आता कमी होणार, विदर्भासाठी दिलासादायक बातमी
दिवसभर शहरात चांगलेच उन्ह तापले. याखेरीज गोंदिया येथे ४६.१, चंद्रपुरात ४५.४ तर अमरावती व ब्रह्मपुरी येथे ४५.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, संध्याकाळी नागपुरातील बेसा, नंदनवन या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने काही काळ समाधानाची स्थिती होती. तसेच संध्याकाळी शहरातही काहीसा आल्हाददायक वारा सुटला होता. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला. त्यातच आता हवामान विभागाने शुक्रवारपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तरीसुद्धा उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून आली. थंड पेये, फळांचे रस आणि आइस्क्रीम विक्रेत्यांकडे मात्र नागरिकांची गर्दी वाढली होती.
आजपासून दिलासा?
गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. आता उष्णतेची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसत असून, अकोला, वाशीम आणि भंडारा वगळता इतर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून पुढील चार दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Lockdown News: देशात लॉकडाऊन लागणार, पेट्रोल १७० रुपयांवर पोहोचणार; काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी, सरकारवर हल्लाबोल
कुठे यलो अलर्ट?
अकोला, वाशीम आणि भंडारा वगळता नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून पुढील चार दिवस वादळी पाऊस आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Chandrashekhar Bawankule: सपकाळांना राज्यात फिरु देणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा, असं का म्हणाले?
पाच दिवसांत उष्माघाताचे २२ बळी
वाढत्या उन्हामुळे शहरात गेल्या पाच दिवसांत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणखी काही नवतपा राहणार असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, जिल्हा व रेल्वे स्थानकावरील मृत्यूची संख्या बघितली तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंभाजी मार्गावरील पुलाखाली ४५ वर्षीय इसम मृतावस्थेत आढळला. तर यशोधरानगर हद्दीतील भिलगाव येथील परशुराम चौकात शारदा को-ऑपरेटिव्ह सोसायटी परिसरातील निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावर ३५ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतांची ओळख पटलेली नाही. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यापूर्वी २४ ते २७ मे दरम्यान शहरात रोज पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसदप्तरी आहे. या सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
