“भोंदू बाबासोबत फोटो असणं गुन्हा नाही, पण त्यांना किती वेळा वाचवलं, किती वेळा पोलिसांना आदेश दिले, याचे पुरावे आमच्याकडे आहेत,” असा दावा रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, “हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही, तर महिलांवर झालेल्या अन्यायाचा आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे.” त्यांनी आरोप केला की, “खरात बाबा प्रकरणात चाकणकर यांचा हस्तक्षेप स्पष्ट दिसून येतो आणि काही वेळा पोलिसांवर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. तुम्ही महिला आहात, मग ज्या महिलांचं शोषण झालं त्या महिला नाहीत का?” असा थेट सवाल उपस्थित करत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“दोन वर्षांपूर्वी काही पीडित महिला पुरावे घेऊन आली, मात्र त्यावेळी या पीडित महिलांना मदत मिळाली नाही. तेव्हा अशोक खरात याच्यावर कारवाई का झाली नाही? तेव्हा सेटलमेंट झाली का? चाकणकर यांनी पदाचा गैरवापर केला. दोन दिवसांत राजीनामा झाला नाही, तर अशा महिलेसोबत काम करणं शक्य नाही. अशा घाण महिलेसोबत आम्ही काम करू शकत नाही. आम्हाला नाईलाजाने पक्षातून अलिप्त व्हावं लागेल,” असा सूचक इशाराही रुपाली ठोंबरे यांनी पक्षनेतृत्वाला दिला आहे.
दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी आणि त्याचे राजकीय परिणाम आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई होणार का? चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
