• Mon. Jun 15th, 2026

    BJP Sandeep Joshi: आधी राजकीय संन्यासाची घोषणा, पण फडणवीसांसोबत चर्चेनंतर निर्णय बदलला; भाजप आमदार संदीप जोशींची घोषणा

    BJP Sandeep Joshi: आधी राजकीय संन्यासाची घोषणा, पण फडणवीसांसोबत चर्चेनंतर निर्णय बदलला; भाजप आमदार संदीप जोशींची घोषणा

    Nagpur News: संदीप जोशी यांचा संन्यासाच्या घोषणेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत त्यांना निर्णय बदलण्याची विनंती केली होती.

    आधी राजकीय संन्यासाची घोषणा, पण फडणवीसांसोबत चर्चेनंतर निर्णय बदलला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करून चर्चेत आलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी आता आपल्या भूमिकेत मोठा बदल करत सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात परतण्याचे संकेत दिले आहेत. “१३ मे पासून मी सहा महिन्यांचा ब्रेक घेत आहे. मात्र त्यानंतर नव्या उर्जेसह पुन्हा राजकारणात सहभागी होणार आहे,” असे स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी राजकीय निवृत्तीच्या घोषणेनंतर घेतलेला यू-टर्न घेतला आहे.

    काही दिवसांपूर्वी जोशी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांनी हा निर्णय तात्पुरता असल्याचे स्पष्ट करत पूर्णपणे राजकारण सोडण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे. १३ मे रोजी त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढील सहा महिने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असून हा काळ विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    संदीप जोशी यांनी सांगितले की, काही शारीरिक अडचणी आणि वैयक्तिक कारणांमुळे हा ब्रेक घेण्याची गरज भासली. “स्वतःला नव्याने तयार करण्यासाठी आणि आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. मात्र हा कायमस्वरूपी संन्यास नसून तात्पुरती विश्रांती आहे,” आपल्या या निर्णयाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “मुख्यमंत्री माझे मित्र, बंधू आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार सहा महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा सक्रिय होणार आहे,” असे जोशी म्हणाले.

    तसेच वरिष्ठ नेत्यांनीही वैयक्तिक संवाद साधत राजकारणातून दूर जाऊ नये, असा सल्ला दिला. “कार्यकर्त्यांची भावना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या आग्रहामुळेच मी माझा निर्णय बदलला,” असं म्हणत सहा महिन्यांच्या या ब्रेकदरम्यान ते पूर्णपणे निष्क्रिय राहणार नसून समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहतील, असेही त्यांनी सांगितले. “राजकारणापासून थोडा काळ दूर राहणार असलो तरी समाजाशी असलेले नाते कायम राहील,” असे जोशी म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा