• Fri. Mar 13th, 2026
    Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार

    कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे.

    आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई मागणी- राजू शेट्टी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग: निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शासनाने येत्या १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग’ बेमुदत रोखून धरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    प्रमुख मागण्या आणि भरपाईचा आकडा

    शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपवले आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा कलमाला ५,००० रुपये प्रति किंवा हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी असं सांगण्यात आलं आहे. तर काजू पीकाला हेक्टरी ३ लाख रुपये मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. पीक विम्याची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात यावी आणि कर्जमाफीबद्दल ज्या बागायतदारांचे नुकसान झाले आहे, त्यांचे चालू कर्जही (थकीत नसले तरी) पूर्णपणे माफ करावे. ही कर्जमाफी एनडीआरएफ निकषांच्या मदतीप्रमाणे २०१९ च्या महापुराप्रमाणे चौपट मदत मिळावी, अशा स्वरुपाची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती राजू शेट्टींनी दिली आहे.

    सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम

    सध्या राज्याचे विधीमंडळ अधिवेशन सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय सभागृहाबाहेर घेता येत नाहीत, असे पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी म्हणाले, “आम्ही संयमाची भूमिका घेत २३ मार्चपर्यंत सरकारची वाट पाहणार आहोत. मात्र, या काळात ठोस शासन निर्णय न आल्यास ही लढाई आरपारची असेल.”

    Maharashtra TimesEknath Khadse: एकनाथ खडसे अडचणीत! मुक्ताईनगर जमीन व्यवहारप्रकरण अंगलट, महसूलमंत्र्यांचे थेट SIT चौकशीचे आदेश

    बोगस औषध कंपन्यांवर निशाणा

    आर्थिक नुकसानीसोबतच बाजारात निकृष्ट दर्जाची कीटकनाशके आणि औषधे विकली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. कृषी विभागाने बोगस कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा सज्जड दमही आंदोलकांनी दिला आहे.

    Maharashtra TimesPune News : अजित पवारांच्या नावे संस्था-स्मारके बांधण्याआधी कुटुंबाची पूर्वपरवानगी बंधनकारक, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून अटी जाहीर

    कोकणी शेतकरी हा मुळात संयमी आहे, पण आता त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ मार्चचा इशारा हा सरकारसाठी शेवटची संधी आहे, असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा