• Fri. Mar 6th, 2026

    युद्धामुळे इंधन तुटवडा झाल्याची अफवा, वाहनधारकांची पेट्रोल पंपावर गर्दी, स्टॉक खरंच संपला, गर्दी टाळण्याचं आवाहन

    युद्धामुळे इंधन तुटवडा झाल्याची अफवा, वाहनधारकांची पेट्रोल पंपावर गर्दी, स्टॉक खरंच संपला, गर्दी टाळण्याचं आवाहन

    Iran Israel War Effect : आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा फटका बसून भारतातील पेट्रोल विक्री बंद राहणार आणि पेट्रोल महागणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरली

    नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर रांगा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड/ छत्रपती संभाजीनगर : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा होण्याची अफवा कालपासून मराठवाड्यातील अनेक भागात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आता पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा स्टॉकही खरोखर संपला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे. परंतु युद्धामुळे कुठलाही इंधन तुटवडा निर्माण झालेला नाही, थोड्या वेळामध्ये पेट्रोल उपलब्ध होईल असं पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

    नांदेडमध्ये अफवांचं पीक

    आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा फटका बसून भारतातील पेट्रोल विक्री बंद राहणार आणि पेट्रोल महागणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर नांदेडमध्ये मंगळवारी रात्री शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अचानक एकच गर्दी केली.
    आसरानगर, बाफना परिसरातील बाबा पेट्रोल पंपावर देखील वाहनधारकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे अनेकांनी टँक फुल देखील केले होते. दरम्यान पेट्रोल पंप बंद होणार नाही, मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोल पंप चालक चैतन्य बापू देशमुख यांनी दिली.
    Maharashtra TimesRajya Sabha Election : राष्ट्रहितासाठी ठाकरेंनी राज्यसभेचा हट्ट सोडावा, काँग्रेसने गणित मांडलं; समीकरण तेच, तरी मविआत पेच
    दुसरीकडे, इराण-इस्रायल युद्ध लांबत गेल्यास त्याचा मोठा परिणाम जगाला भोगावा लागू शकतो. कारण पश्चिम आशिया ही केवळ भू-राजकीय संघर्षभूमी नाही, तर तेलसंपन्न प्रदेशही आहे. तसेच जागतिक व्यापारातील एक महत्त्वाचा दुवाही आहे.
    Maharashtra TimesAvinash Mohite : पवारांच्या चेल्यानं रणशिंग फुंकले, साखर कारखाना निवडणुकीसाठी दंड थोपटले, कृष्णाकाठी उडणार धुरळा

    तेलाच्या किमती भडकण्याची भीती

    दरम्यान, पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांच्यामध्ये असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक हा या व्यापाराचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जगभरातील एकूण तेलाच्या व्यापारापैकी वीस टक्के व्यापार या सामुद्रधुनीतून होतो. इराण युद्धाचा फटका या व्यापारावर होणार असून, त्यामुळे तेलाच्या किमती भडकण्याची भीती आहे. कमालीच्या वैश्विक झालेल्या आजच्या जगात एका प्रदेशातील युद्ध केवळ त्या प्रदेशापुरते मर्यादित राहत नसल्याचं या गोष्टीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा आगडोंब शांत न झाल्यास त्याची धग संपूर्ण जगाला सोसावी लागणार, यात कुठलीही शंका नाही.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा