• Wed. Jun 17th, 2026
    मान्सूनसाठी २० तारीख उजाडणार? महामुंबईत ‘चटका’ कायम राहणार; मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

    Monsoon Update: दक्षिण भारतात मान्सूनचा प्रवास सुरू असला तरी महाराष्ट्रात तो रखडला आहे. महामुंबईत तापमान वाढलेलं असून येत्या आठवड्यातही राज्याला दिलासा मिळणार नाही. रविवार, 14 जून रोजी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर ठिकाणी हवामान कसं असेल?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मान्सूनची अरबी समुद्रातील पावसाची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील हर्णेपासून पुढचा पावसाचा प्रवास मात्र आणखी रखडण्याची शक्यता आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊनही उन्हाच्या तडाख्यापासून मात्र महाराष्ट्रातील नागरिकांची सुटका होताना दिसत नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते तर महामुंबई परिसरात उष्ण आणि दमट वातावरणाचा त्रास १६ जूनपर्यंत जाणवू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन अद्ययावत माहितीमध्ये १२ जूनपर्यंत पुढच्या तीन-चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकेल असे सांगण्यात येत होते. मात्र शनिवारी १३ जून रोजी अचानकपणे या अद्ययावत माहितीतून महाराष्ट्राचे नाव काढण्यात आले. १३ जूनच्या माहितीनुसार २ ते ३ दिवसांमध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशाचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगडचा भाग येथे मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नसून महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रावरचे चिंतेचे ढग अधिक गडद झाल्याचे चित्र आहे.

    Maharashtra Times1950नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती, Super El Ninoची 63 टक्के शक्यता; डिसेंबरपर्यंत तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज

    सॅटेलाइट चित्रांमध्ये पाहिले असता महाराष्ट्रावर पावसाचे ढग कुठेही दिसत नाहीत. महाराष्ट्रात पावसाचा पुढचा प्रवास १९ ते २० तारखेपर्यंत लांबू शकतो असे मत अभ्यासकांकडून नोंदवले जात आहे. महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीयवात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उष्ण वारे बाहेर फेकले जात आहेत. या उष्ण वाऱ्यांमुळे पावसाळी ढगांची निर्मितीही होत नाही. सध्या वायव्येकडून मोठ्या प्रमाणात वारे असून पश्चिमेकडून येणारे वारे थोड्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येत आहेत. परिणाम किमान तापमानाचा पारा चढाच आहे. मात्र ही आर्द्रता पावसासाठी पुरेशी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्द्रता मिळत असल्याने सात दिवसांपासून अधिक दिवस मुंबईतील किमान तापमान ३० किंवा त्यापुढे नोंदवले जात आहे.

    राज्याच्या अंतर्भागातही किमान तापमान सरासरीपेक्षा चढे आहे. कमाल तापमान आणि सरासरी तापमानातील फरक खूप मोठा आहे. अहिल्यानगर येथे ४, मालेगाव येथे ४.४, सातारा येथे ४.५ तर सांगली येथे ४.१ असा फरक कमाल तापमान आणि सरासरी तापमानात नोंदला गेला आहे.

    मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

    प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये १६ जूनपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकते. त्यानंतर कदाचित मेघगर्जनेसह पावसाची नोंद होईल. मात्र हा पाऊस फार मोठ्या प्रमाणात नसेल. उर्वरित राज्यात रविवारी नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम येथे रविवार, सोमवार या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अमरावती, बुलडाणा येथे रविवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

    पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?

    कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास रखडला आहे. पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर नोंदवलं जाऊ शकतं. कोल्हापूर आणि इतर घाट प्रदेशात पूर्वमान्सूनच्या सरी बरसू शकतात.

    Maharashtra TimesWeather Update: महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रखडला, आता राज्यावर दुहेरी संकट, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा

    खानदेशातील हवामान पाहा

    खानदेशातही मान्सूनचं आगमन रखडलं असून दिवसात तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून उष्मा कायम असेल. येत्या आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी मुसळधार सरींसाठी नागरिकांना जुलैअखेरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा