• Sat. Mar 7th, 2026
    Supreme Court OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा पेच कायम; 22 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवरच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

    ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. २२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आता…

    सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातल्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय दिला आहे.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज्यात आता काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर महापालिका अन् जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही होऊन गेल्या आहेत. परंतू राज्यातल्या 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या पुढे गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्रामध्ये 22 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आता या 22 जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांना मोठी दणका मानला जात आहे.

    महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेण्यास परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारने मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने आता उर्वरित सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास मनाई करणारा निर्णय दिला आहे.

    राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र व राज्य सरकार या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बांठिया समितीपूर्व स्थितीनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण निश्चित करताना 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आले.

    Maharashtra TimesDevendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    या पार्श्वभूमीवर 22 जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समित्यांमधील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पार पडल्या आहेत. उर्वरित 22 जिल्हा परिषद आणि संबंधित पंचायत समित्यांच्या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    राज्य सरकारच्यावतीनं तुषार मेहता यांनी अंतिम आदेशाच्या अधीन राहून निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं अशी परवानगी देता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्याचे मानले जात आहे.

    Maharashtra TimesRohit Pawar : अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, संपूर्ण सभागृह सुन्न

    दुसरीकडे, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच अंतिम सुनावणी सुरू करणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आम्ही या प्रकरणाची अंतिम सुनावणी लवकरच घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित सर्व वकिलांना अंतिम सुनावणीसाठी लागणारी आवश्यक पूर्वतयारी आणि कागदपत्रे पूर्ण करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा