• Wed. Mar 11th, 2026
    नगर हादरलं! आठवडी बाजारातच मोठा राडा; शेतीच्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक, बाजार समिती संचालकाचं डोकं फुटलं

    नगर जिल्ह्यातील जेऊरमध्ये आठवडी बाजारादरम्यान दोन गटांत अचानक तणाव निर्माण झाला. शेतीच्या वादातून घडलेल्या घटनेनंतर परिसरात हालचाल वाढली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: नगर तालुक्यातील जेऊर येथे शनिवारी सकाळी शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण राडा झाला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले असून, या घटनेत नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मगर यांच्यासह तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, जेऊर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका शेतजमिनीवरून दोन गटांत वाद सुरू होता. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटातील लोक लाठ्या-काठ्यांसह आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू केली. दरम्यान, या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले बाजार समितीचे संचालक मधुकर मगर हेदेखील दगडफेकीचा शिकार झाले. त्यांच्या डोक्याला लागल्याची माहिती असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesSanjay Khodke Accident : अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद, धक्कादायक व्हिडीओ समोर

    आठवडी बाजारामुळे भीतीचे वातावरण

    योगायोगाने शनिवारी जेऊरचा आठवडी बाजार असल्याने तिथे मोठी गर्दी होती. भरवस्तीत आणि बाजारच्या दिवशीच ही दगडफेक झाल्याने व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची मोठी पळापळ झाली. यापूर्वी ग्रामदैवताच्या यात्रेदरम्यानही अशाच प्रकारची हिंसक घटना घडली होती, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सध्या शांतता असली तरी तणाव कायम आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी जखमींची आणि घटनास्थळाची पाहणी केली.

    गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

    या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून दुपारपर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जमिनीचा हा जुना वाद आता हिंसक वळणावर गेल्याने जेऊरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा