• Sun. Mar 8th, 2026
    Nandurbar News: पुरोगामी महाराष्ट्रात मतमोजणीपूर्वी अघोरी प्रयोग? राजकीय चर्चांना उधाण, नागरिकांमध्ये भीती… काय घडलं?

    नंदुरबार, महेश पाटील: मार्गशीर्ष अमावस्येच्या मुहूर्तावर शुक्रवारी रात्री तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुलीवर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मतमोजणीच्या अगदी आदल्या दिवशी ही घटना घडल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

    २१व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असतानाही समाजात अंधश्रद्धेचे प्रकार अजूनही सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मार्गशीर्ष अमावस्येला ‘दर्श अमावस्या’ असेही संबोधले जाते. पंचांगानुसार ही अमावस्या शेती, पितरपूजन, स्नान, दान आणि दीपपूजेसाठी महत्त्वाची मानली जाते. चंद्रदर्शन होत नसल्याने तिला ‘दर्श’ असे नाव देण्यात आले आहे.

    अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी घराची स्वच्छता करून लक्ष्मीपूजन केले जाते. मात्र याच अमावस्येचा मुहूर्त साधून अज्ञात व्यक्तींनी चौफुलीवर अघोरी जादूटोण्याचा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चौफुलीच्या मध्यभागी खडूने मोठे वर्तुळ आखण्यात आले होते.

    ‘जितकी टीका केली, तितकाच पाठिंबाही दिला’; शालिनीताईंच्या निधनानंतर शरद पवार भावूक

    या वर्तुळाच्या आत फाटकी काळ्या रंगाची पॅन्ट, शाळकरी मुलाची बॅग, शाळेचे बूट, शर्ट, रुमाल अशी विविध वस्त्रे ठेवण्यात आली होती. तसेच नवीन ताट, दोन वाट्या, ग्लास, लिंबू, कुंकू आणि इतर पूजेचे साहित्यही त्या ठिकाणी आढळून आले. संपूर्ण दृश्य पाहता हा प्रकार साधा नसून अघोरी जादूटोण्याचाच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

    रस्त्याच्या अगदी मधोमध हा प्रकार केल्यामुळे सकाळच्या वेळी मार्गावरून ये–जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक वाहनधारकांनी धडकी भरल्याने त्या वर्तुळाला चुकवून सावकाश किंवा पर्यायी मार्गाने प्रवास केला. काही नागरिकांनी थांबून हा प्रकार पाहिल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करत अंधश्रद्धेवर नाराजी व्यक्त केली.

    दरम्यान, तळोदा नगरपालिकेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असून, त्याच्या एक दिवस आधी हा प्रकार घडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

    अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांवर प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. विज्ञानवादी विचारसरणी रुजवण्यासाठी जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाने सजग राहावे, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed