• Wed. Mar 11th, 2026
    नागपुरात डॉक्टर तरुणीने झोपेतच बॉयफ्रेंडला संपवलं, मग स्वत:वर वार करत भलताच बनाव रचला, पण…

    Nagpur Doctor Killed Boyfriend: नागपुरात प्रेमसंबंधाचा भयंकर अंत झाल्याची घटना पाहायला मिळाली. येथे एका डॉक्टर तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. त्यानंतर तिने वेगळीच कहाणी रचली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर: प्रेमसंबंध संपुष्टात आणताना झालेल्या वादातून डॉक्टर असलेल्या प्रेयसीने चाकूने छातीवर वार करून प्रियकराची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही वार करून प्रियकराने खुनाचा प्रयत्न केल्याचा बनाव केल्याची थरारक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    बालाजी विनायक कल्याणे (वय 28, रा. मुदखेड, जि. नांदेड) असे मृताचे तर रितू देशमुख (वय 25, दोन्ही रा. मुदखेड, जि.नांदेड) असे मारेकरी प्रेयसीचे नाव आहे.

    बालाजी हा एकवर्षापूर्वी नागपुरात आला. तो नंदनवन कॉलनीतील खोली भाड्याने घेऊन स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रितू व बालाजी दोघेही नातेवाइक आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. बीएएमसच्या शिक्षणासाठी ती नागपुरात आली होती. ती नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतच अन्यत्र भाड्याने राहते. रितू सध्या इंटर्नशीप करीत आहेत. बालाजी नागपुरात आल्यानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मी उच्च शिक्षित आहे. तू सध्या बेरोजगार आहे. आपले लग्न होणे आताच शक्य नाही, असे ती त्याला म्हणायची.

    लग्नाबाबत वडिलांशी बोल, असेही तिने त्याला अनेकदा म्हटले. यावरून दोघांमध्ये खटके उडायचे. बुधवारीही बालाजीने रितूला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला. बालाजीने लग्नाचा हट्ट धरला. वडिलांसोबत बोल, असे रितू बालाजीला म्हणाली. बालाजीने रितूच्या वडिलांच्या मोबाइलवर फोन केला. रितूच्या वडिलांनी त्याची समजूत घातली. नोकरी नसताना मी मुलीचे लग्न कसे करू, असे रितूचे वडील त्याला म्हणाले. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. रितू ही बालाजीसोबत त्याच्या घरी आली. दोघेही झोपी गेले.
    Maharashtra Timesशेवटी आई ही आईच असते!!! ज्या बाईमुळे पोटची पोरगी कायमची गमावली, तिचंच लेकरू जीवापाड सांभाळतेय ही माऊली
    गुरूवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास रितू जागी झाली. तिने घरातील चाकू घेतला. बालाजीच्या छातीवर चाकूने तब्बल चार वार केले. त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बचावासाठी रितूने चाकूने स्वत:च्या कपाळवर आणि छातीवर वार केले. त्यानंतर तिने आरडाओरड करायला सुरूवात केली. शेजारी राहणारा बालाजीच्या मित्राला जाग आली. त्याने बालाजीच्या घराचा दरवाजा ठोठावला. काही वेळाने रितूने दरवाजा उघडला. बालाजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याला दिसला. रितू जखमी होती. तो घारबला. स्वत:ला सावरत त्याने रितूला विचारणा केली.

    तेव्हा ती म्हणाली की, बालाजीने आधी माझ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वत:च्या छातीवर वार करून आत्महत्या केली, अशी माहिती तिने बालाजीच्या मित्राला दिली. दरम्यान, अन्य शेजारीही जमले. एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून बालाजीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. रितूलाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला सुट्टी देण्यात आली. गुरूवारी रात्री नंदनवन पोलिसांनी रितूविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा