• Wed. Mar 11th, 2026

    ‘गुन्ह्याची व्याप्ती मोठी, 300 कोटी कोणत्या अकाउंटला गेले? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट’, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तीवाद

    ‘गुन्ह्याची व्याप्ती मोठी, 300 कोटी कोणत्या अकाउंटला गेले? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट’, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तीवाद

    पुण्याच्या मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हिला आज न्यायालयात दाखल करण्यात आलं. यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद पार पडला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणात शीतल तेजवानीला काल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केल्यानंतर आज साडेतीन वाजता शीतल तेजवानी हिला पुणे सत्र न्यायलयात हजर करण्यात आले. तेजवानीच्या वकिलांनी पुणे कोर्टात जामीन मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला आहे. तर, याउलट सरकारी पक्षाच्या वकिलांकडून तिच्या जामिनासाठी कडाडून विरोध केला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शीतल तेजवानीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोर्टात नेमकं काय-काय घडलं? याबाबतचा सविस्तर युक्तिवाद आपण जाणून घेऊयात.

    “शीतल तेजवानीने २००६ ते २००८ या कालावधीत कोणतेही अधिकार नसताना मुंढवा भागातील ४० एकर जागेचे महार वतनदारांकडून कुल मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ऍटर्नी) घेतले. सदर जमीन शासनाच्या मालकीची असताना तेजवानीचे सदर जमीन महार वतनदारांची असल्याचा दावा केला आणि त्यासाठी खोटी कागदपत्रे जोडली होती”, असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांनी केला.

    ‘११ हजार भरुन जमीन बळकावण्याचा प्रयत्न’, सरकारी वकिलांचा युक्तिवाद

    “२०१३ मध्ये तेजवानीचा दावा तत्कालीन महसुलमंत्र्यांनी (बाळासाहेब थोरात ) फेटाळून लावला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात तेजवानीने धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तो दावा फेटाळला होता. तेजवानीने या जमीनीसाठी सारा कर भरण्याचा कोणताही अधिकार नसताना फक्त अकरा हजार रुपयांचा चेक तेजवानीचे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. तो देखील वठलेला नाही. सदर जमीन बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांची आहे. मात्र अवघे अकरा हजार रुपये भरुन सदर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. तेजवानीने अकरा हजार रुपयेच का घेतले, त्यासाठी तीचा उद्देश काय होता यासाठी तेजवानीची चौकशी करायची आहे’, असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.

    दरम्यान, “तेजवानीने अमेडीया कंपनीच्या दिग्वीजय पाटील यांना ३०० कोटींना सदर जमीन विकण्याचा प्रयत्न केला . ते ३०० कोटी रुपये कोणत्या अकाउंटला दिले गेले आहेत याचा तपास करायचा आहे. हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट आहे. या गुन्ह्याची व्यप्ती मोठी आहे. आणखी आरोपी यामधे सहभागी असण्याची शक्यता आहे. यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे”, असादेखील युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.

    तेजवानीच्या वकिलांचा तहसीलदारांवर खापर फोडण्याचा प्रयत्न

    तर दुसरीकडे सदर वादग्रस्त जागा मुळ महार वतनदारांचीच असल्याचा दावा तेजवानीच्या वकिलांचा केला आहे. “तहसीलदार येवलेंनी अमेडीया कंपनीला जमीन सोपविण्यासाठी जीऑलॉजीकल सोसायटीला पत्र दिले. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. येवलेकडे पोलीसांनी चौकशी केलेली नाही. त्याला अटकपूर्व जामीन मिळालाय आणि आमच्यावर कारवाई केलीय”, असं म्हणत शीतल तेजवानीच्या वकीलांनी तहसीलदार येवलेवर खापर फोडण्याचा प्रयत्न देखील कोर्टात केला.

    शीतल तेजवानीचा मोबाईल जप्त केला आहे. या जागेचा व्यवहार करताना तीचा कोणा कोणाशी संबंध आला, कोणाशी बोलणे झाले याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकील कोर्टात म्हणाले. दरम्यान, शीतल तेजवानीला मराठी समजत नाही. तरीही तिला मराठीतून नोटीस बजावण्यात आली, असा तेजवानीच्या वकीलांनी कोर्टात दावा केला आहे. तर, तेजवानीला तिची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही, असा देखील दावा तिच्या वकिलांचा न्यायालयात केला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा