Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून पुढील काही दिवस हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. वाऱ्याचा वेग वाढण्यासोबतच समुद्र खवळलेला असल्याने, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई परिसरातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असून, मच्छीमारांनी आपल्या बोटी धक्क्याला लावल्या आहेत.
वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, दर्शनावेळी गर्दीत मोठी दुर्घटना; 9 भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
5 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे, तर बंगालच्या उपसागरातील प्रणाली पूर्वेकडून सक्रिय आहे. या दोन हवामान प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे राज्यात 5 नोव्हेंबरपर्यंत ठिकठिकाणी हलका, मध्यम आणि काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.दिवाळीनंतर साधारण कोरडं हवामान अपेक्षित असतं. मात्र अशातच पुन्हा आलेल्या या पावसामुळे शेती कामांवर आणि पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. मात्र, काही ठिकाणी हा पाऊस उशिरा आलेल्या रब्बी पिकांसाठी वरदान ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे
हवामानातील या अनिश्चित बदलामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांनी वादळी वाऱ्यांपासून आणि उंच लाटांपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान,महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने विदर्भ, मराठवाड्यातील शेतीत मोठं नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला. त्यातून बळीराजा सावरतो न सावरतो तोपर्यंत पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली असून थोडंफार राहिलेलं पिकंही आडवं झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात, चिंतेत सापडला आहे.

