Chhatrapati Sambhajinagar News: तळेगावपुरतीच ही समस्या मर्यादित नसून फुलंब्री तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट आहे.
फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत सात शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून, पावसाळ्यात छताला गळती लागते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे अभ्यास सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना बादल्यांच्या साह्याने पाणी बाहेर काढून वर्ग कोरडे करावे लागले.
Marathwada Rain : मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस, 929 धरणात केवळ 25 टक्के पाणीसाठा
निवेदने देऊनही कारवाई नाही
शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडे अनेकदा लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शालेय समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब गव्हाड यांनी केला. ‘दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना याच समस्येला सामोरे जावे लागते. गळक्या वर्गखोल्यांमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
६८ शाळा नादुरुस्त
तालुक्यातील ६८ जिल्हा परिषद शाळांच्या इमारती गळक्या व नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. निधीची कमतरता आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थी असुरक्षित वातावरणात शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे.
पाणी गळती होणाऱ्या प्रमुख शाळा :
पिंपळगाव गांगदेव, धनगरवाडी (धामणगाव), तळेगाव वाडी (उर्दू शाळा), मराठी शाळा (तळेगाव), तळेगाव उर्दू शाळा, वाहेगाव, शिववस्ती शाळा (निधोना), हिराजी वस्ती (निधोना), सिंदाडी वस्ती (पाल), कुडळे वस्ती शाळा, पानेवाडी उर्दू शाळा, बैरागीवाडी (बाबरा), बाबुळगाव खुर्द (बाबरा), हनुमान नगर वस्ती (पीरबावडा), गेवराई पायगा, भाकरखाणे वस्ती (वडोद बाजार), पीरबावडा मराठी शाळा, पुंडलिकनगर वस्ती (वडोद बाजार), वाघलगाव, कवीटखेडा आणि आळंद उर्दू शाळा यांसह अनेक शाळांचा यामध्ये समावेश आहे.
Digital Arrest : IPS बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत घाबरवलं, 12 लाखांनी गंडवलं
‘दुरुस्ती केव्हा होणार ?’
शाळा दुरुस्तीबाबत स्थानिक स्तरावरील किरकोळ कामे ग्रामपंचायतीकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीची कामे कधी सुरू होणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी कोट्यवधींचा निधी मिळतो. तरीही सरकारी शाळांची अशी अवस्था… काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा
