• Thu. Mar 12th, 2026
    राहुल गांधींच्या आरोपांवर अजित पवारांचा जोरदार प्रहार; म्हणाले, ‘हरले की आठवतं…’

    Ajit Pawar Slams Rahul Gandhi : राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम ठीक, हरल्यावर मतचोरीचा आरोप करणे हा विरोधाभास आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीला यश मिळूनही राष्ट्रवादीने कधी आरोप केले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुतीसोबत लढायच्या की स्वतंत्र, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : राहुल गांधी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर निशाणा साधला असून अनेक ठिकाणी मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार म्हणाले, ‘जेव्हा ते निवडणुका जिंकतात तेव्हा त्यांना ईव्हीएम किंवा मतदार याद्यांचा काही प्रश्न वाटत नाही. पण जसेच ते पराभूत होतात, लगेचच ईव्हीएम हॅकिंग, मतचोरी असे आरोप सुरू होतात. हा विरोधाभास लोकांसमोर स्पष्ट दिसतो.’

    ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. ‘तेव्हा आम्ही कधीही मतचोरी किंवा ईव्हीएम हॅकिंगसारखा आरोप केला नाही. आम्ही पराभव स्वीकारून कामाला लागलो. पण काँग्रेस, आम आदमी पार्टी किंवा ममता बॅनर्जी यांच्या बाबतीतही पाहिलं, तर जिंकले की सर्व ठीक आणि हरले की मशीनवर प्रश्नचिन्ह’ असे टोला अजित पवार यांनी लगावला, कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली, तेलंगणात विजय मिळवला, हिमाचलमध्येही सरकार स्थापन झाले, तेव्हा कुठेही ईव्हीएमवर शंका घेतली गेली नाही. ‘ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या, आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाब जिंकले, तेव्हा काही वाद नाही. मग पराभव झाल्यावरच का शंका येते, हा प्रश्न मला पडतो,’ असे पवार म्हणाले.
    Maharashtra Times‘अंतरवलीत पोलिसांवर दगडफेकीचा प्लॅन, पवारांचा आमदारही त्यात सहभागी’, छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप
    यावेळी त्यांनी विरोधकांनी पसरवलेल्या फेक नेरेटिव्हवरही टीका केली. ‘लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही राज्यघटना बदलायला निघालो आहोत, असा खोटा प्रचार केला गेला. त्यामुळे आम्हाला मोठा फटका बसला. मात्र विधानसभेत आम्ही वेळेवर मार्ग काढला आणि लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी यांसारख्या उपयुक्त योजना राबवून परत चांगले यश मिळवले,’ असे ते म्हणाले.

    आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत अजित पवार यांनी सांगितले की, त्या महायुतीसोबत लढायच्या की स्वतंत्र, याचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून घेतला जाईल. ‘कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागांची राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. स्थानिक नेतृत्वाच्या सूचनांनुसारच पुढचा निर्णय होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

    विदर्भातील राजकीय समीकरणावर बोलताना पवार म्हणाले, ‘विदर्भ कुणाचाच कायम बालेकिल्ला राहू शकत नाही. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पक्षांना इथून यश मिळालं आहे. आज भाजप मोठा पक्ष आहे, नागपूरचे प्रतिनिधित्व देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी करत आहेत. मात्र आमच्याही कार्यकर्त्यांना महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.’

    सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचे नमूद करून पवार म्हणाले की, जवळपास सात वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. ‘यावेळी नव्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल. आमच्या पक्षाने यासाठी तयारीचा वेग घेतला आहे. नागपुरात चिंतन शिबिरात यावर सविस्तर चर्चा होणार आहे,’ असेही अजित पवार यांनी सांगितले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा