Ajit Pawar Slams Rahul Gandhi : राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम ठीक, हरल्यावर मतचोरीचा आरोप करणे हा विरोधाभास आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीला यश मिळूनही राष्ट्रवादीने कधी आरोप केले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुतीसोबत लढायच्या की स्वतंत्र, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. ‘तेव्हा आम्ही कधीही मतचोरी किंवा ईव्हीएम हॅकिंगसारखा आरोप केला नाही. आम्ही पराभव स्वीकारून कामाला लागलो. पण काँग्रेस, आम आदमी पार्टी किंवा ममता बॅनर्जी यांच्या बाबतीतही पाहिलं, तर जिंकले की सर्व ठीक आणि हरले की मशीनवर प्रश्नचिन्ह’ असे टोला अजित पवार यांनी लगावला, कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली, तेलंगणात विजय मिळवला, हिमाचलमध्येही सरकार स्थापन झाले, तेव्हा कुठेही ईव्हीएमवर शंका घेतली गेली नाही. ‘ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या, आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाब जिंकले, तेव्हा काही वाद नाही. मग पराभव झाल्यावरच का शंका येते, हा प्रश्न मला पडतो,’ असे पवार म्हणाले.
‘अंतरवलीत पोलिसांवर दगडफेकीचा प्लॅन, पवारांचा आमदारही त्यात सहभागी’, छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप
यावेळी त्यांनी विरोधकांनी पसरवलेल्या फेक नेरेटिव्हवरही टीका केली. ‘लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही राज्यघटना बदलायला निघालो आहोत, असा खोटा प्रचार केला गेला. त्यामुळे आम्हाला मोठा फटका बसला. मात्र विधानसभेत आम्ही वेळेवर मार्ग काढला आणि लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी यांसारख्या उपयुक्त योजना राबवून परत चांगले यश मिळवले,’ असे ते म्हणाले.
आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत अजित पवार यांनी सांगितले की, त्या महायुतीसोबत लढायच्या की स्वतंत्र, याचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून घेतला जाईल. ‘कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागांची राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. स्थानिक नेतृत्वाच्या सूचनांनुसारच पुढचा निर्णय होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील राजकीय समीकरणावर बोलताना पवार म्हणाले, ‘विदर्भ कुणाचाच कायम बालेकिल्ला राहू शकत नाही. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पक्षांना इथून यश मिळालं आहे. आज भाजप मोठा पक्ष आहे, नागपूरचे प्रतिनिधित्व देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी करत आहेत. मात्र आमच्याही कार्यकर्त्यांना महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.’
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचे नमूद करून पवार म्हणाले की, जवळपास सात वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. ‘यावेळी नव्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल. आमच्या पक्षाने यासाठी तयारीचा वेग घेतला आहे. नागपुरात चिंतन शिबिरात यावर सविस्तर चर्चा होणार आहे,’ असेही अजित पवार यांनी सांगितले.

