• Wed. Jun 10th, 2026

    दोन दशकांनंतरही दादर स्थानक टँकरवर अवलंबून, वर्षानुवर्षे पाणी जोडणी प्रलंबित; पश्चिम रेल्वे, टर्मिनसवर फटका

    दोन दशकांनंतरही दादर स्थानक टँकरवर अवलंबून, वर्षानुवर्षे पाणी जोडणी प्रलंबित; पश्चिम रेल्वे, टर्मिनसवर फटका

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसपैकी एक असलेले दादर टर्मिनस सुरू होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला. मात्र आजही पश्चिम रेल्वेचे दादर स्थानक आणि टर्मिनस टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिका यांच्यात शेकडो कोटी रुपयांचा थकबाकीचा वाद आहे. यामुळे महापालिकेची नळ जोडणी नसल्याने त्याचा थेट परिणाम लाखो रेल्वे प्रवाशांवर होत आहे.

    पाणी जोडणी का प्रलंबित?

    दादर टर्मिनस-स्थानकाची पाणीजोडणी रखडण्यामागे रेल्वे आणि महापालिकेमधील आर्थिक वाद कारणीभूत आहे. पश्चिम रेल्वेची महापालिकेकडे सुमारे २४५ कोटी रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी आहे. महापालिकेकडे पश्चिम रेल्वेच्या सुमारे ३३८ कोटी रुपयांच्या ‘वे-लीव्ह’ शुल्काची थकबाकी आहे. दोन्ही सरकारी यंत्रणा आहेत. दोन्ही यंत्रणांमधील याच आर्थिक तणावामुळे वर्षानुवर्षे पाणी जोडणी प्रलंबित आहे. विशेषत: टँकरसंपासारख्या घडामोडींमध्ये प्रवाशांच्या अडचणींत अधिकच वाढ होते.

    Pune Metro: मेट्रो स्थानकांखाली रिक्षा, कॅबचालकांची मनमानी, पुण्यात वाहतूककोंडी आणि प्रवाशांची लूट कायम; प्रशासन सुस्त

    पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात दादर टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस अशा लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची हाताळणी होते. मेल-एक्स्प्रेसमध्ये पाणी भरणे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फलाट स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रनिंगरूम, कँटीन अशा विविध कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते. महापालिकेची नळ जोडणी नसल्याने पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केला जातो.

    दादर टर्मिनससाठी रोज ४० टँकरद्वारे सुमारे चार लाख लिटर पाणी पुरवले जाते. दादर स्थानकासाठी आठ टँकरद्वारे ८० हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाते. अशाप्रकारे दादर स्थानक आणि टर्मिनस मिळून दररोज तब्बल चार लाख ८० हजार लिटर पाण्याचा पुरवठा रोज ४८ टँकरच्या माध्यमातून केला जात आहे. महापालिकेकडून दादर टर्मिनस आणि स्थानकासाठी थेट जलपुरवठा केला जात नाही. टर्मिनस आणि स्थानकात रोज साधारण दोन लाख प्रवाशांचा राबता असतो. त्यामुळे रोज जवळपास पाच लाख लिटर पाण्याची मागणी निर्माण होत आहे. महापालिकेची नळजोडणी मिळावी, यासाठी पश्चिम रेल्वेने सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र महापालिकेकडून नळजोडणी झालेली नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    Maharashtra TimesNashik Metro: 8 वर्षांनंतर ‘नियो मेट्रो’ रद्द, मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये नियमित मेट्रोचा विचार; मंत्रालयात बैठक

    टँकर संप अखेर मागे!

    पाणी टँकर चालक-मालकांचा संप अखेर मंगळवारी मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत टँकर मालकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात टँकर मालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याबाबत चार दिवसांत लेखी नोटीस देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अमोल मांढरे यांनी दिली.

    महसूल विभागाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांच्या निषेधार्थ टँकर चालक-मालकांनी संप पुकारला होता. प्रशासनाने कारवाई होणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, लेखी हमी मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली होती.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed