• Mon. Jun 15th, 2026
    घरगुती वाद विकोपाला, रागाच्या भरात जावयावर हल्ला अन्…, घटनेनं खळबळ

    Akola Crime News : अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात घरगुती वादातून जावयाचा खून झाला आहे. नागेश नामक व्यक्तीचा सासरवाडीत वाद झाल्यानंतर सासरच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : रागाच्या भरात कोणती घटना घडेल याचा नेम काही लागू शकत नाही. अकोल्यातील पातूर तालुक्याच्या अंबाशी गावातही असाच प्रकार समोर आला आहे. घरगुती वादातून जावयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागेश गोपणारायन असे मृतकाचे नाव आहे.

    अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील अंबाशी येथे घरगुती वादातून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबाशी येथील रहिवासी छाया हिवराळे हिचा विवाह अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील नागेश गोपनारायण यांच्याशी झाला होता. सध्या नागेश असोला फाटा येथे वास्तव्यास होता. तो सासारवाडीत अंबाशी येथे आला असताना काही कारणावरून सासरवाडीच्या लोकांसोबत घरगुती वाद झाला होता.

    शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात नागेश याच्यावर काठ्यांनी आणि कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला, यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस व चांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला व मृतदेह अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यातील आणखी काही आरोपी आहेत का? हा वाद नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

    या अमानुष वृत्तीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने एक कुटुंब उध्वस्त केले आहे. एखादा घरगुती वाद कसा जीवघेणा ठरतो यावर नागरिकांमध्ये आपसूकच चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा