Madhuri Elephant Return Kolhapur: दुखापतींमुळे वर्षभरावापूर्वी ‘वनतारा’मध्ये दाखल झालेली माधुरी हत्तीण प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यांनतर आता कोल्हापूरला परतण्यास सज्ज झाली आहे.
गुजरातमधील वनतारा (जामनगर) संस्थेचे पथक नांदणीत दाखल झाले होते आणि माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पुनर्वसन केंद्राची त्यांच्याकडून सखोल पाहणीही करण्यात आली आहे. त्यादरम्यान नांदणी मठाचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी सुरक्षित पुनरागमनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.तर वनताराने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात माधुरी पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. तिला कोल्हापूरातील खऱ्या घरी परतण्यास सज्ज असल्याचेही म्हटले आहे.
महास्वामींची अधिकृत माहिती..
नांदणी मठाचे महास्वामी म्हणाले, “राज्यशासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्या माध्यमातून आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक सहाय्य देण्याची तयारी सुरू आहे. सर्व कायदेशीर अनुमती आणि वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर माधुरीला नांदणीमठात आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यामुळे लवकरच सर्वांची लाडकी माधुरी हत्तीण परतणार आहे.”
राजू शेट्टी व्यक्त केले समाधान..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “जनतेच्या रेट्यामुळे अखेर लहानांपासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्या गळ्यातली ताईत असणारी माधुरी 11 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर का होईना, पुन्हा नांदणीमध्ये येणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.” त्यांनी मागील लॉन्ग मार्चचा संदर्भ देत, परतीची प्रक्रिया अंतिम झाल्याने तो मार्च आणखी काढावा लागू नये, असे सांगितले.
लवकरच नांदणीत माधुरीवाड्यात असेल माधुरी..
सध्या वनताराच्या वैद्यकीय अहवालांची अंतिम पुष्टी आणि नांदणीतील पुनर्वसन केंद्रात आवश्यक दुरुस्त्या पूर्ण होणे प्रमुख आहे. नांदणी मठाच्या 6 एकर जागेत ‘माधुरी वाडा’ साकारण्याचा निर्णय होता; मात्र मंजुरीअंती डीपी रोड असल्याची तांत्रिक बाब समोर आली आहे, जो निर्णय आता मंत्रालयात पोहोचला आहे. शेड रंगरंगोटी, शॉवर व कुलर, वाळू ट्रॅक, सुरक्षेसाठी जाळे असा तात्पुरता निवास आणि सोयी-सुविधांची पूर्तता दोन दिवसांत करून अहवाल आणि व्हिडिओ उच्चस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल; समितीच्या हिरव्या कंदिलानंतर माधुरी लवकरच नांदणीत दाखल होईल.
माधुरीला 28 जुलै 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय देखभालीसाठी वनतारात हलवण्यात आले होते; त्यानंतर लाखो नागरिकांनी तिच्या परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आता महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्यात सकारात्मक घडामोडी सुरू असल्याने परतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसह माधुरीसाठी संघर्ष केलेल्या सर्वांना माधुरीच्या पुनरागमनाची आतुरता लागली आहे.
