• Mon. Mar 9th, 2026
    आजी-नातवंडांना अग्नी दिला, तोवर बातमी आली सूनबाईही गेल्या, गॅसगळतीने सोलापुरातील कुटुंब पोखरलं

    Solapur Family Gas Leakage Death : घरगुती गॅस सिलेंडरमधील गळतीमुळे सोलापूरमधील अख्खं बलरामवाले कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

    सोलापुरात कुटुंबातील चौघांचा अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर : सोलापूर शहरातील लष्कर येथील बलरामवाले परिवात गॅस गळतीमुळे झालेल्या मृतांचा आकडा चारवर गेला आहे. सुरुवातीला घरातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान आजीनेही अखेरचा श्वास घेतला, तर आता चिमुकल्यांच्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे. बलरामवाले परिवारामधील तब्बल चौघांचा बळी गेल्यानंतर आता या कुटुंबात उरलं तरी कोण? असा सवाल सोलापूरकर करत आहेत. क्रूर नियतीनं कोपावं तरी किती? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

    घरगुती गॅस सिलेंडरमधील गळतीमुळे सोलापूरमधील अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. दोन चिमुरडी, आजी आणि आई यांचा मृत्यू झाला. 35 वर्षीय रंजनाबाई राज बलरामवाले, रा. बालाजी मंदिर समोर, नळबाझार चौक, लष्कर, यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले,पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

    गॅस गळती दुर्घटनेतील मृत नातवंडांसह आजीच्या चितेला भडाग्नी देत असतानाच चिमुकल्यांच्या आईचादेखील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने अख्खं सोलापूर शहर हळहळ व्यक्त करत आहे.

    सोलापूर शहरातील नळ बजार चौक बालाजी मंदिर परिसरात पाच बाय दहा इतक्या छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या बलरामवाले परिवारातील सदस्यांचा एकामागून एक मृत्यू झाला. शरीरात वाढत गेलेले कार्बन मोनॉक्साईडमुळे ऑक्सिजनची पातळी संपूर्णपणे नष्ट होऊन श्वसन प्रक्रिया बंद पडल्याने रंजनाबाईचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
    Maharashtra TimesPune Crime : विवाहाच्या आमिषाने पुण्यातील हॉटेलमध्ये अत्याचार, सोशल मीडियावर ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीला लुबाडलं
    हर्ष, अक्षरा आणि विमलबाई या तिघांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या तिघांची चिता पेटती असतानाच चौथा बळी गेल्याने सर्वत्र एकच टाहो फोडला जात आहे. शवविच्छेदनानंतर विवाहित महिलेचा मृतदेह बलरामवाले यांच्या घरासमोर आणला असता, त्यांच्या घरासमोर नातेवाईकांच्या आणि समाज बांधवांच्या अंत्यदर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. दुपारच्या सुमारास विवाहितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि समाज बांधवांनी एकच हंबरडा फोडला.
    Maharashtra TimesAkola Crime : माझे मिस्टर घरी नाहीयेत, दुपारी या! 52 वर्षीय ज्वेलरला लताने घरी बोलावलं, एवढ्यात नवरा पोहोचला अन्…
    शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 40 वर्षीय राज बलरामवाले यांच्या शरीरातील प्रतिकारक्षमता चांगली असल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. परंतु अधूनमधून ते मेंदूवरील ताबा सुटल्याप्रमाणे वागत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा