एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातूनही एका तरुण तडफदार नेत्याने अर्ज भरला आहे. या अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उमेश म्हेत्रे यांनी उपराष्ट्रपतीपदा सारख्या देशातील दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी अर्ज दाखल करून सामान्य तरुणांमधील आत्मविश्वास आणि ध्येयवादी वृत्तीचे दर्शन घडवले आहे. भारतीय संविधानानुसार, उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराला किमान ३५ वर्षे वय आणि २० प्रस्तावक तसेच २० अनुमोदकांचा पाठिंबा आवश्यक आहे. उमेशने या सर्व अटींची पूर्तता केली असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांमध्ये अभिमानासोबतच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक पातळीवर उमेशच्या या निर्णयाने तरुणांमध्ये नवे प्रेरणास्थान निर्माण केले आहे. राजकीय वर्तुळातही त्याच्या या धाडसाची चर्चा आहे, कारण अशा उच्च पदासाठी ग्रामीण भागातील तरुणाने पाऊल उचलणे ही दुर्मीळ बाब आहे. उमेशच्या उमेदवारीमुळे सहजपूर गाव आणि दौंड तालुका राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत. आता निवडणूक आयोगाकडून उमेशच्या अर्जाची छाननी होईल, आणि त्याची उमेदवारी वैध ठरल्यास तो निवडणुकीत काय प्रभाव पाडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उमेशच्या या धाडसी पावलाने लोकशाहीतील सहभागाचे नवे उदाहरण घालून दिले आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. येत्या 9 सप्टेंबरला या निवडणूकीचं मतदान पार पडणार आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे.

