• Tue. Mar 10th, 2026
    नंतर भेट, सांगतो…! ऐकायला येत नसलेल्या कार्यकर्त्याला अजितदादाचे हटके उत्तर, उपस्थितांमध्ये एकच हशा

    Ajit Pawar : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याला उत्तर दिले आहे. एका कार्यकर्त्याने केलेल्या टिप्पणीवर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे एकच हशा पिकला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याला चपखल उत्तर देत उपस्थितांचे लक्ष वेधले. सर्वात उंच ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान त्यांनी भाषण केले. यावेळी एका कार्यकर्त्याने पाठीमागून टिप्पणी केली, “दादा, पुन्हा सांगा, ऐकायला आलं नाही.” यावर अजितदादांनी आपल्या नेहमीच्या बेधडक अंदाजात प्रत्युत्तर दिले, “नंतर भेट, सांगतो. तुला ऐकायला आलं नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो!” या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि दादांच्या खुमासदार शैलीचे कौतुक झाले.

    बारामती येथे सर्वांत उंच तिरंगा उभारण्याच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी हे उत्तर दिले. या सोहळ्यादरम्यान अजित पवार यांनी गंभीर मुद्द्यावरही भाष्य केले. बारामतीतील खांबांच्या नट बोल्टची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी मकोका लावण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे.
    Maharashtra Timesमोठी बातमी: पुण्यातून महायुतीत मिठाचा खडा? राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा, कार्यकर्त्यांना थेट सूचना
    बारामती शहरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभाचे आज स्वातंत्र्यदिनी लोकार्पण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बारामती शहरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) तीस मीटर उंचीचा (शंभर फूट उंच) राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून हा स्तंभ साकारण्यात आला.

    ध्वजस्तंभाच्या पावित्र्याचे रक्षण होईल आणि समाजात आदर्श निर्माण होईल, असे अजित पवारांनी नमूद केले. हा सोहळा बारामतीत मोठ्या उत्साहात पार पडला. अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्थानिक विकासकामांचाही आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला, तर त्यांच्या कार्यकर्त्याशी संवादातील खटकेबाज उत्तराने सर्वांचे मन जिंकले. अजितदादांच्या या शैलीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा