• Fri. Mar 13th, 2026
    पुढील काही तास सतर्कतेचे! राज्यातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट, पाऊस धो-धो बरसणार

    Maharashtra Weather Update : राज्याभरात पावसाने दमदार कमबॅक केले आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असून बळीराजा सुखावला आहे. परंतु हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राज्यभरात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु अनेक ठिकाणी पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन आणि वाहतुकीवर मोठा प्रभाव पडला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील २४ तास देखील अनेक जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

    कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि विदर्भातील अमरावतीमध्ये वीजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. परिणामी घाट परिसरातील तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    Maharashtra Weather : पुढील चार दिवस राज्यभरात धो-धो! ‘या’ भागांत अतिवृष्टीची शक्यता, रेड अलर्ट जारी
    मुंबई ठाण्यासह कोकण, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, अशा भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    कोकणात अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे ऑरेंज अलर्ट असणार आहे. यामुळे बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनीही मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम असणार आहे. पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांतील घाट परिसर ऑन अलर्ट असणार आहे. तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील मुसळधार पाऊस बसण्याचा अंदाज आहे.

    विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची विक्रमी नोंद झाली. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५१ टक्के एवढा पाऊस झाला आहे, दरम्यान हवामान खात्याने आणखी दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अमरावतीमध्येही वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा