• Sun. Jun 14th, 2026
    ‘पराभवानंतर काही नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, त्यामध्ये राऊत नंबर एक’ तटकरेंकडून तिखट समाचार

    Sunil Tatkare Slams Sanjay Raut : काश्मीर येथे पहलगाम झालेल्या हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेचा आता खासदार सुनील तटकरेंनी समाचार घेतला आहे.

    (फोटो– Lipi)

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : काश्मीर येथे पहलगाम झालेल्या हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन गेले होते. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर ज्या काही नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्या परिणाम झालेल्या नेत्यांमध्ये नंबर एकचे आहेत ते संजय राऊत, असा खोचक टोला सुनील तटकरेंनी लगावला आहे.

    सुनील तटकरे म्हणाले, राऊत कधीही कुठल्याही विषयावर रोज सकाळी नऊ वाजता बोलत असतात. त्यांचे बोलणे तर्कहीन आणि दिशाहीन असते. विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर त्यांच्यातले नैराश्य ते अजून घालवू शकलेले नाहीत. कदाचित त्यांच्यावर मानसिक उपचाराची गरज असेल, असं वाटत आहे.
    Vijay Wadettiwar : ‘धर्म विचारण्यासाठी दहशतवाद्यांना वेळ होता का?’; वादग्रस्त वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव
    रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, याबाबतचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. हा विषय तुमच्याकडून व गोगावले यांच्याकडून दोघांकडूनही प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे. यावर तटकरे म्हणाले की, मी कधीही आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनात कोणता विषय प्रतिष्ठेचा केलेला नाही. शेवटी प्रत्येकाच्या कामाचं मूल्यमापन होत असते हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, अशी सावध प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

    दरम्यान मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धाबाबत विचारलं असता तटकरे म्हणाले, हे दोघेही कोकणातील आहेत. दोघांनीही एकेकाळी एकाच पक्षात काम केलं आहे. त्यामुळे नेमकं कशामुळे इश्यू तयार झाला आहे, हे त्या दोघांना माहिती. माहिती म्हणून काम करत असताना काही वेळेला प्रत्येकाचे मत सारखेच होतील, सर्वच गोष्टीवर एकमत होईल अशातला भाग नाही. पण कोणीही जाहीर वक्तव्य करू नयेत अशी अपेक्षा महायुतीमधील प्रत्येक वरिष्ठ नेत्याची आहे, सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

    मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावर रखडलेल्या माणगाव येथे वाहतूककोंडी होत आहे यासाठी बायपास मार्ग रखडला आहे याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे तीन ते चार वेळा बैठक झाली. या कामाची आता नव्याने वर्क ऑर्डर झाली आहे. त्यामुळे येथे चार ते पाच दिवसात संबंधित ठेकेदार माणगाव बायपासचे काम सुरू करीत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

    त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करण्यात आले. दापोली तालुक्यातील पाच नररत्नांच्या मूळगावातून आणलेल्या कलशाचे पूजन यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पालगड येथील साने गुरुजी, मुरुड येथील भारतरत्न महर्षी कर्वे, भारतरत्न पा.वा.काणे,चिखलगाव येथील लोकमान्य टिळक, केळशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु याकूबबाबा सर्वरी यांच्या मूळ गावातून आणलेल्या मंगल कलशांचे पूजन करण्यात आले. हे कलश राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत रत्नागिरी व मुंबई येथे नेण्यात येणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, महिला जिल्हाध्यक्ष व नगरसेविका साधना बोत्रे, रमा बेलोसे, नेहा जाधव, विनिता शिगवण, मोहन मुळये, माजी नगरसेवक नितीन मयेकर आदी उपस्थित होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed