• Sun. Jun 7th, 2026

    Vijay Wadettiwar : ‘धर्म विचारण्यासाठी दहशतवाद्यांना वेळ होता का?’; वादग्रस्त वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव

    Vijay Wadettiwar : ‘धर्म विचारण्यासाठी दहशतवाद्यांना वेळ होता का?’; वादग्रस्त वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारव

    Vijay Wadettiwar on Pahalgam Attack : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावरून वादग्रस्त विधान केले. हल्लेखोरांनी धर्म विचारला होता का, असे ते म्हणाले. यावर टीका झाल्यावर त्यांनी भूमिका बदलली. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    नागपूर : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला तेव्हा त्यांना धर्म विचारायला वेळ होता का? असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्याने काही तासातच त्यांनी आपली भूमिका बदलली. ‘दहशतवादी आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, काँग्रेसचा त्यास पाठिंबा राहील’ असे सारवासारव करणारे वक्तव्य नंतर त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी सोमवारी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “दहशतवादी हल्ल्याचा मुख्य हेतू दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारतातील एकात्मता भंग करणे आणि देशात अस्थिरता निर्माण करणे हा आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करावी. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढणे अत्यावश्यक आहे.”

    त्यापूर्वी वडेट्टीवार यांनी “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?” असे विधान करत खळबळ उडवून दिली. “काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काहीजण सांगतायत की असे काही घडलेच नाही. सत्ताधाऱ्यांकडून भारत-पाकिस्तान असा जप चालला असतो. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावे”, असं म्हटलं.

    “पहलगाममध्ये जे काही घडले, २७ जण त्या हल्ल्यात मारले गेले. पहलगाममध्ये, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारले. हे सगळे होत असताना मोदी सरकार काय करत होते? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती,” असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

    ‘शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी करा’

    वडेट्टीवारांनी सध्या राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. “यासाठी एसआयटी नेमकी गेली पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी होऊन यात जे संस्थाचालक दोषी आहेत, शिक्षक विभागाची यंत्रणा दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, ज्यांनी घोटाळे केले नाही त्यांना वाचवण्यासाठी निरपराध माणसाचा बळी घेऊ नका,” असेही ते म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed