Prakash Ambedkar Reacted on India-Pak Indus Treaty : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर भूमिका घेतली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानला पाणी बंद केल्याचं पत्र भारत सरकारने दिलेलं आहे. मात्र पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही पत्रात उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को अस हे पत्र आहे. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवलं तर सरकार कोणत्या प्रकारची कारवाई करत आहे, हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये, असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे.
आंबेडकरांनी पुढे असेही नमूद केले की, ‘कोणताही द्विपक्षीय करार लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते.’ पण मी म्हणतो भाडमध्ये गेलं ते रद्द केलंय, तर केलं रद्द. मात्र त्याची फॉलो अप ऍक्शन घ्या ना. जे समोर आलं, त्यात धरणातील गाळ काढणार पाणी अडवणार याला दहा वर्षे लागतील, अशा शब्दांत त्यांनी सरकारला एकप्रकारे सतर्क राहून काम करण्याचा सल्ला दिला आहे.
आंबेडकरांनी पुढे हल्ल्याबाबत सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, हल्ल्यापूर्वी पाकिस्तान आर्मी चीफने केलेलं भाषण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये त्याने टू नेशन थेअरी मांडली आहे. आपल्या इंटेलिजन्स विभागाने ही माहिती देखील सरकारला दिली. मात्र त्यावेळी सरकार झोपून राहिलं. कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. आज आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. इस पार या उस पार, मात्र राजकीय नेतृत्वात धडक कारवाईची ती इच्छा दिसत नाही. इच्छाशक्ती व्हावी यासाठी २मे ला हुतात्मा स्मारकासमोर आम्ही निदर्शने करणार आहोत, असा इशाराही आंबेडकरांनी दिला आहे.

