• Mon. Jun 8th, 2026
    Pahalgam Attack: काश्मीरऐवजी हिमाचल; दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांकडून सुट्टीच्या नियोजनात बदल

    ​​Pahalgam Attack: काश्मीर परिसरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर पर्यटकांना काश्मीरला जाणे शक्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

    हायलाइट्स:

    • पर्यटकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण
    • बुकिंग रद्द करण्याऐवजी अन्य पर्यटनस्थळांकडे मोर्चा
    • टूर कंपन्यांकडून अन्य पर्यायी स्थळांचे नियोजन
    Best Places To Visit In Himachal Pradesh In Summer (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण: एप्रिल-मे महिन्यांच्या कडकडीत उन्हाळ्यात काश्मीर पर्यटन करण्याचे नियोजन केले जाते. यंदाही शेकडो पर्यटकांनी ट्रॅव्हल्स कंपन्या, एजंट यांच्या माध्यमातून काश्मीरसाठी बुकिंग केले होते. मात्र, मंगळवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पर्यटकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. मात्र, अनेक दिवसांपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेऊन केलेल्या नियोजनात आता बदल करून काश्मीरऐवजी हिमाचल प्रदेशातील सिमला, कुल्लू-मनाली यांसारख्या ठिकाणांकडे आपले बुकिंग वळवण्याची विनंती पर्यटक करत आहेत.

    काश्मीर परिसरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर पर्यटकांना काश्मीरला जाणे शक्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती निवळेपर्यंत पर्यटनासाठी तिथे जाणे, अडचणीचे ठरणारे आहे. केंद्र सरकारसह लष्कराने या परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तरीही पर्यटक भयभीत झाल्याचा थेट परिणाम येथील पर्यटनांवर झाला आहे. सध्या काश्मीरमध्ये असलेले पर्यटक घराकडे परतत आहेत. तसेच काश्मीरपासून काहीसे दूर सुरक्षित अशा हिमाचल प्रदेशाकडे वळत आहेत.
    Pahalgam Terror Attack: अतिरेकी आले, हल्ला करुन गेले; चौकीदार काय करत होता? शंकराचार्यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा
    डोंबिवलीतील मधुचंद्रा टूर्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, यंदा काश्मीरकडे जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ चांगला होता. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच पर्यटक काश्मीरला जात आहेत. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरचे बुकिंग रद्द करत, देशातील अन्य स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. अनेक बुकिंग कंपन्यांनी पर्यटकांच्या विनंतीनुसार, त्यांना सिमला, कुल्लू, मनालीचे बुकिंग फिरवून दिले आहे. बुकिंग रद्द करणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण ५ ते १० टक्के इतकेच आहे.

    मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या असल्याने बहुतांश कुटुंबांत एप्रिल, मे महिन्यांत पर्यटनासाठी घेतलेल्या सुट्ट्या, त्यानुसार तिकिटे हॉटेल बुकिंग केले जाते. काही जण तर सुट्ट्यांसाठी कर्जही काढतात. त्यामुळे आगाऊ केलेले नियोजन बदलणे कठीण असते. त्यामुळे पर्यटक दौरा रद्द करत नाहीत. मात्र, जे पर्यटक दौरा रद्द करत आहेत, त्यांना बुकिंगची रक्कम परत केली जात आहे, असे मधुचंद्रा टूर्स कंपनीचे अधिकारी चेतन यांनी सांगितले.
    Pahalgam Terror Attack : भारत-पाक सीमेवर घडामोडी वाढल्या, शेतकऱ्यांना दोन दिवसांत शेत खाली करण्याचे आदेश, सरकार मोठ्या तयारीत?
    मुजोर टूर कंपन्यांकडून पर्यटक वेठीस
    दरवर्षी कल्याणमध्ये टूर कंपन्यांकडून काश्मीर दौऱ्याचे नियोजन केले जाते. यंदाही अनेकांनी काश्मीर दौऱ्याचे बुकिंग केले होते. मात्र, आता हल्ल्यानंतर बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात येत आहे. परंतु, या ट्रॅव्हल्स कंपन्या पर्यटकांना वेठीस धरत असल्याचा अनुभव मागील दोन दिवसांत आला आहे. काश्मीरमधील ज्या कॉटेज आणि हॉटेल्समध्ये बुकिंग केले आहे, त्यांनी परतावा दिला, तरच तो तुम्हाला परत केला जाईल, अशी उत्तरे काही टूर कंपन्यांचे एजंट देत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार न करता, नागरिकांची हजारोंची रक्कम हडप करू पाहणाऱ्या या मुजोर एजंटांवर कारवाई करण्याची मागणी संतापलेल्या पर्यटकांनी केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed