• Fri. Mar 20th, 2026

    Pune News : ताडी पिल्याने तरुणाचा मृत्यू, गावातल्या महिला संतापल्या, जे केलं त्याने…

    Pune News : ताडी पिल्याने तरुणाचा मृत्यू, गावातल्या महिला संतापल्या, जे केलं त्याने…

    Pune Women Aggressive Against Liquor : पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त महिलांनी ताडी केंद्रावर तोडफोड केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून, महिलांनी अवैध ताडी विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अशा घटनांमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    (फोटो– Lipi)

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : पुण्यात एका तरुणाचा केमिकल मिश्रित ताडी पिल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातील महिला प्रचंड संतापल्या. कारण अशा ताडीमुळे याआधीदेखील मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी जिथे अशाप्रकारची ताडी बनवली जाते तिथे जास्त तोडफोड केली. महिलांनी रस्त्यावर उतरत याविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. तसेच ताडी केंद्रावर मोर्चा नेत जोरदार घोषणाबाजी केली. महिलांचा संताप पाहून ताडी बनवणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. पोलिसांनी अशा ताडी केंद्रांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली. या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    भोर तालुक्यातील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय विजय शेडगे या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. तसेच गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विजय शेडगे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने गावातील महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गावातील ताडी विक्री केंद्र आणि अवैध दारूच्या दुकानांची तोडफोड केली.

    अनेक तरुण अवैध ताडी आणि दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत ४ ते ५ तरुणांचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, महिलांनी थेट कारवाईचा पवित्रा घेत ताडी तयार करणाऱ्या दुकानातील बॅरल रस्त्यावर ओतले आणि गावातील दोन अवैध दारू विक्रीच्या दुकानांची तोडफोड केली.

    गावात तणावाचे वातावरण

    महिलांचा हा आक्रमक पवित्रा आणि तोडफोडीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पोलीस प्रशासनाने या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. विजयच्या मृत्यूने गावकऱ्यांचा उद्रेक झाला असून, ते आता कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

    या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असला, तरी अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर अवैध ताडी आणि दारू विक्रीवर तातडीने बंदी घातली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed