• Sun. Jun 14th, 2026
    Rupali Chakankar: ‘अशोक खरात प्रकरणात माझ्यावरचे आरोप वेदनादायक’; बदनामी करणाऱ्यांना रुपाली चाकणकरांच्या धडाधड नोटीसा, थेट दिल्ली कोर्टापर्यंत खेचलं

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा आता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आता अशोक खरात प्रकरणात माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचलं असल्याचं सांगितलं आहे, त्यांनी व्हिडिओमधून सविस्तर भूमिका मांडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अखेर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली असून, कोणताही पुरावा नसताना करण्यात आलेल्या आरोपांविरोधात आता कायद्याच्या चौकटीत लढा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

    रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, खरात प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट होती. खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमीन व्यवहारातील भागीदारीशी किंवा इतर कोणत्याही वादग्रस्त बाबींशी आपला संबंध नव्हता. तसेच आपण कोणत्याही महिलेला खरात यांच्याकडे नेले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

    ‘बदनामीचे आरोप सहन केले’

    गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अत्यंत अश्लाघ्य भाषेत आपल्यावर आणि कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. कोणताही पुरावा नसताना सातत्याने बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता हा लढा न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. खरात यांना कुटुंबीय आध्यात्मिक गुरु मानत होते. पाद्यपूजेचा जो व्हिडिओ समोर आला, तो अनेक वर्षांपूर्वीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या काळात आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षही नव्हतो, असेही त्यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesJalgaon News: बिबट्याशी थेट दोन हात! जळगावच्या तरुणाने जिवाची पर्वा न करता जिवंत बिबट्या पकडला; पंचक्रोशीत धाडसाची चर्चा

    ‘पदांचा राजीनामा तपासासाठी दिला’

    खरात प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा, यासाठी आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता, असे चाकणकर यांनी म्हटले. मात्र त्यानंतरही आपल्याविरोधात चिखलफेक सुरूच राहिल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोकांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ तयार केले आणि बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

    आशा मिरगेंविरोधात न्यायालयीन कारवाई

    चाकणकर यांनी सांगितले की, एका चर्चासत्रात आशा मिरगे यांनी केलेल्या कथित वक्तव्यांनंतर त्यांनी ४ एप्रिल रोजी कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यात आली नसल्याने ती अनेकदा परत आली. अखेर माझगाव न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले. त्या दिवशी आपण स्वतःही न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    ‘स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी लढा’

    पुरावा नसताना चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात ही लढाई असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. आशा मिरगे यांच्याव्यतिरिक्त इतर काही महिलांनी केलेल्या आरोपांबाबतही दिल्ली उच्च न्यायालयातून नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

    “हा लढा केवळ माझ्यासाठी नाही, तर कोणत्याही महिलेच्या सन्मानावर विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रवृत्तीविरोधातील आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा