Weather Forecast of Maharashtra : महाराष्ट्रभर नागरिकांना सध्या तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी एक्स हँडलवर ट्विट करत यासंदर्भीत माहिती दिली आहे. ते म्हणाले, हवामान विभागाने राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत मिश्र प्रकारचे तीव्र हवामानची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अकोला आणि चंद्रपूरमध्येच उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आता गारपिटीचाही अंदाज आहे. ज्यासाठी हवामान विभागाने आता चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी २७ एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.
‘मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात देखील मिश्र वातावरण असणार आहे. या प्रदेशात उष्ण आणि दमट परिस्थिती असणार आहे. तसेच गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज दक्षिण कोकणात गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे.’ असेही होसाळीकर यांनी नमूद केले.
तर २८ एप्रिलला विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत यलो अलर्ट असणार आहे. तर भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भवासीयांना उन्हाळा तीव्र झळा बसत आहेत. दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर जाणे जीवावर येते. ही स्थिती असते मे महिन्यात. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यातच ही उष्णता नकोशी झाली आहे. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. अशात पावसाचा इशारा देण्यात आल्याने विदर्भवासीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांनी शेतीपिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

