• Fri. Mar 13th, 2026

    Sangram Thopate : असं काय घडलं की काँग्रेस पक्ष सोडावा लागतोय? संग्राम थोपटेंनी अखेर खदखद बोलून दाखवली

    Sangram Thopate : असं काय घडलं की काँग्रेस पक्ष सोडावा लागतोय? संग्राम थोपटेंनी अखेर खदखद बोलून दाखवली

    Sangram Thopate Allegations on Congress : संग्राम थोपटे यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. थोपटे यांचे वडीलही राज्याचे शिक्षणमंत्री होते. थोपटे कुटुंबियांचं काँग्रेस पक्षासोबत घनिष्ठ संबंध होते. विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेतही संग्राम थोपटे विधानसभा निवडणुकीत जिंकून आले होते. थोपटे कुटुंबियांनी काँग्रेस पक्षासाठीदेखील मोठं काम केलं. पण आज याच संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. थोपटे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मनातली खदखद अखेर व्यक्त केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भोर, पुणे : भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत येत्या 22 एप्रिल 2025 ला भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भोर येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली. आपण कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 22 एप्रिलला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत.

    संग्राम थोपटे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून, राजगड, मुळशी आणि भोर येथे कार्यकर्त्यांशी चर्चा केली. “कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, मला पक्षात सातत्याने डावलले जात आहे. विकासकामांना गती देण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज आहे. त्यांच्या इच्छेनुसारच मी भाजपात प्रवेश करत आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसने त्यांना मंत्रिपद, विधानसभा अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद अशा कोणत्याही संधी दिल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळाली, पण मला संधी मिळाली नाही. 2019 पासून ही नाराजी हळूहळू वाढत गेली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    ‘काँग्रेसने मला हवी ती ताकद दिली नाही’

    संग्राम थोपटे यांनी राजगड सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणींचा उल्लेख करत, याबाबत काँग्रेसकडून कोणताही पाठपुरावा झाला नसल्याचे सांगितले. “राजगड कारखान्याला 80 कोटींचे कर्ज मंजूर झाले होते, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामुळे ते रोखले गेले. कारखान्याला मदत मिळावी, यासाठी भाजपची वाट निवडली,” असे ते म्हणाले. भाजप हा मोठा पक्ष असून, विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस हा आश्वासक चेहरा आहे. सलग तीन वेळा आमदार झालो, तरी काँग्रेसने मला हवी ती ताकद दिली नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

    थोपटे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर दुर्लक्षाचा आरोप केला. “निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही काँग्रेसकडून कुणी संपर्क साधला नाही. फॉर्म भरण्यासाठीही वेळ दिला गेला नाही. ज्या पक्षातून बाहेर पडलो, त्यांच्या भविष्याचा विचार मी का करू?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 22 एप्रिलला मुंबईत पक्षप्रवेशानंतर भोर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा मानस थोपटे यांनी व्यक्त केला. “मी कोणाच्या दबावाला बळी पडत नाही. माझ्या कर्तृत्वानुसार मला संधी मिळाली पाहिजे, हा पक्षाचा प्रश्न आहे,” असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed