Nitin Gadkari Big Announcement About Toll : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की, लवकरच ‘जितका प्रवास, तितकाच पथकर’ हे नवीन धोरण लागू होणार आहे. येत्या १५ दिवसांत उपग्रह आधारित पथकर प्रणाली सुरू होईल, ज्यामुळे टोल नाक्यांवर वाहनांना थांबावे लागणार नाही. रस्ते विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद असून, राष्ट्रीय महामार्गांवर किलोमीटरनुसार पथकर आकारला जाईल.
‘रस्ते बांधणीसाठी यंदा ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रस्त्यावर जितके किलोमीटर गाडी चालवली जाईल, तितकाच पथकर घेतला जाईल, असे धोरण लवकरच आणण्यात येणार आहे’, असे गडकरी म्हणाले.
‘विकासाचा संबंध रस्त्यांशी आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात रस्ते, महामार्गांचा मोठा वाटा आहे. देशातील दळणवळणाचा खर्च कमी होणे आवश्यक असून, ते रस्त्यांद्वारेच शक्य आहे. सध्या प्रगत देशाच्या तुलनेत दळणवळणाचा खर्च आपल्याकडे अधिक आहे. तो सध्याच्या १६वरून नऊ टक्क्यांवर आणला जाणार आहे’, असे गडकरी यांनी सांगितले. ‘आपण दरवर्षी २२ लाख कोटी रुपयांचे खनिज तेल आयात करतो. २००४पासून पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायाची चाचपणी करीत आहोत. आता शेतकऱ्यांनी पर्यायी ऊर्जेची निर्मिती करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी इथेनॉलबरोबरच हायड्रोजन बायो फ्युएल वापरायला सुरुवात होणार आहे. कचऱ्यापासून मिथेन जैवइंधन तयार करण्यासाठी ४०० कारखाने सुरू होणार असून, त्यातील ९० कारखाने सुरू आहेत. भाताचे धांड जाळून प्रदूषण होण्यापेक्षा त्यातून इंधन बनवण्यावर भर दिला जाईल’, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात भारताला जलमार्ग बांधावे लागतील. येणाऱ्या काळामध्ये १०८ जलमार्गांची निर्मिती हे लक्ष्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.