Beed News : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर, संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी 2014 मध्ये संदीप क्षीरसागर शिक्षण सभापती असताना बिंदू नामावलीत 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये सुरेश धस यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आलाय.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना दिसले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली. बीड नगरपालिकेच्या लेखापालांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे, हेच नाहीतर लेखापालांनी पोलिस अधीक्षकांकडे थेट संदीप क्षीरसागर यांची तक्रार केली. दोन कार्यकर्ते लेखापालांच्या घरी संदीप क्षीरसागर यांनी पाठवले होते.
हे प्रकरण ताजे असतानाच आता संदीप क्षीरसागर यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. तत्कालीन शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून 2014 साली बिंदू नामावलीच्या माध्यमातून 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलाय. बाळासाहेब सानप म्हणाले, बीड जिल्ह्यात 2014 साली बिंदू नामावलीच्या माध्यमातून शिक्षकांच्या झालेल्या बदली प्रक्रियेचा मुद्दा उद्भवला आहे.
तत्कालीन मंत्री सुरेश धस, शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून तब्बल 39 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, 2014 ते 24 पर्यंत बिंदू नामावलीचा प्रश्न कुठेच निघाला नाही. मात्र, आता आमदार सुरेश धस हा प्रश्न उपस्थित करून जाती-जातीत तेढ निर्माण करत आहेत. धस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री, मंत्री अतुल सावे आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट शिक्षकांचे शिष्टमंडळ घेणार असल्याचं सानप यांनी म्हटले आहे.