• Fri. Apr 25th, 2025 6:24:46 PM
    हवामान बदलाने आंब्याच्या झाडांना फटका, कर्नाटक हापूसचा हंगाम लांबणीवर; दरावर किती परिणाम?

    Hapus Mango Market Rate : पावसाचा फटका आंबा पिकाला बसला असून यामुळे कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. याचा परिणाम किमतीवरही पाहायला मिळतो आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : लांबलेल्या पावसाचा फटका कर्नाटक हापूस आंब्याला बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. येत्या दहा दिवसांत कर्नाटक हापूसची आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. सध्या घाऊक बाजारात चार ते पाच डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला १२०० ते १८०० रुपये दर मिळत आहे. आवक वाढल्यानंतर दर आवाक्यात येणार आहेत.

    हवामान बदलाचा आंबा पिकाला फटका

    ‘डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कर्नाटकमध्ये हापूस आंब्याला चांगला मोहोर आला होता. मात्र, सातत्याने हवामानात बदल झाल्याने आंब्याच्या झाडांना फटका बसला. पावसामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर गळून पडला. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्यात बाजारात नेहमी प्रमाणे आवक होऊ शकली नाही. मात्र, आता झाडांवर असलेल्या फळांची स्थिती चांगली असल्याने येत्या १० ते १५ दिवसांत कर्नाटक हापूसची आवक वाढेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दर वर्षी ७०० ते ८०० पेटी आवक होत असते. मात्र, यंदा केवळ १५० ते २०० पेट्यांची आवक झाली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक अपेक्षित आहे. आवक वाढल्यानंतर दर आवाक्यात येतील,’ असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
    Pune News : वाढत्या उन्हामुळे पुणेकर तहानले, २२ गावे आणि १३३ वाड्या-वस्त्यासाठी २० टँकर
    कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या अंदाजानुसार १५ एप्रिलनंतर चांगल्या प्रकारे आंब्याची आवक सुरू होईल. यंदा आंब्याची आवक १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या घाऊक बाजारात चार ते पाच डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला १२०० ते १८०० रुपये दर मिळत आहे. दोन डझनाच्या बॉक्सला ३०० ते ६०० रुपये दर मिळत आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात कर्नाटकाच्या विविध भागातून आंब्याची आवक होत आहे. मागील वर्षी मे महिन्यात २५ हजार पेट्यांची रोज आवक होत होती.
    Nanded News : औषधी मिरची लागवडीचा यशस्वी प्रयोग, शेतकरी मालामाल; तब्बल ४५ लाखांचं उत्पन्न

    ‘एफडीए’तर्फे आंब्यांची तपासणी मोहिम

    अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडपेयांसह आंब्यांची तपासणी सुरू केली आहे. आंबा पिकविण्यासाठी ‘कॅल्शिअम कार्बाइड’सह कृत्रिम रसायनांचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा ‘एफडीए’ने दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडपेय, बर्फासह आंबे आणि अन्य फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (जीबीएस) रुग्ण आढळून आले होते. दूषित पाणी, अन्नामुळे रुग्णांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याचे तपासणी आढळून आले होते. त्यामुळे अन्नपदार्थांची नियमीतपणे तपासणी करणे आवश्यक असल्याचा मुद्दा समोर आला होता.

    Pune News : हवामान बदलाने आंब्याच्या झाडांना फटका, कर्नाटक हापूसचा हंगाम लांबणीवर; दरावर किती परिणाम?

    ‘पुणे विभागात तपासणी करण्यात येत आहे. तपासणीमध्ये फळ आणि थंडपेयांचे नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. भेसळ आढळल्यास कारवाई करण्यात येईल,’ असे ‘एफडीए’चे सहआयुक्त डॉ. सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed