• Tue. Apr 8th, 2025 5:37:43 PM

    Chandrashekhar Bawankule : ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला

    Chandrashekhar Bawankule : ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला

    Chandrashekhar Bawankule on Manikrao Kokate : “फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स

    नागपूर :“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले, माहिती नाही. मात्र, सरकार म्हणून मी बळीराजाची माफी मागतो”, असे सांगून राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मित्रपक्षाच्या मंत्र्यांची पाठराखण केली. “फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये”, असा सल्लाही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. नागपूर आणि अमरावती विभागातील नुकसानाबाबत पंचनामे सुरू आहेत. एकही शेतकरी सुटू नये, याची खबरदारी घेण्याची सूचना संबंधित यंत्रणांना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

    “कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी?”, असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे. तसेच “शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, मग साखरपुडे करा, लग्न करा”, असंही कोकाटे म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

    दरम्यान, “वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षाने राज्यातील जनतेशी बेईमानी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेले पाऊल जनता माफ करणार नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे पतन केले आहे”, अशी तोफही बावनकुळे यांनी डागली. “वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्याचा अभ्यास करून त्यानुसार कामकाज केले जाईल. कायद्याची सविस्तर माहिती आल्याविना जिल्हाधिकारी वा महसूल विभागाची भूमिका काय राहील, हे सांगता येणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    “पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कुठलीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील कोणत्याही रुग्णालयात पैशांची मागणी केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास परवाना रद्द केला जाईल”, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

    अतिक्रमण काढणार

    “डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यावर तातडीने कारवाई केली जाईल. उपराजधानीतील सरकारी आणि नझूलच्या भूखंडांवरील अतिक्रमण काढण्यासाठी योजना तयार करून अभियान राबवण्यात येईल”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed