• Thu. Mar 12th, 2026
    राजे निवडणुकीपुरतेच; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे राजकारण्यांना खडे बोल

    Vishwas Patil: छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सांगताना पाटील यांनी निवडक आणि सोयीच्या इतिहासाच्या आधारे दुही माजवणाऱ्या समाजघटकांना फटकारले.

    महाराष्ट्र टाइम्स
    vishwas patil2

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदू म्हणून जन्माला आले आणि त्यांनी हिंदू धर्माचा उद्धार व गौरव केला; पण त्याबरोबरच त्यांनी अखंड मानवधर्मातून सर्व जाती-धर्माच्या लोकांना आपले मानले. हे दोन्ही राजे तेव्हाच मानवतेच्या महामंदिरामध्ये जाऊन विराजमान झाले. मात्र, आजचे सर्व राजकीय पक्ष आणि राजकारणी त्यांना निवडणुकीच्या आणि मतदानाच्या बाजारामध्ये खेचून उभे करीत आहेत,’ या शब्दांत कादंबरीकार विश्वास पाटील यांनी राजकारण्यांना गुरुवारी खडे बोल सुनावले.

    सहकारनगर येथील ‘सहजीवन व्याख्यानमाले’त ‘प्रेरणास्रोत शंभुराजे’ या विषयावर पाटील यांचे व्याख्यान झाले. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सांगताना पाटील यांनी निवडक आणि सोयीच्या इतिहासाच्या आधारे दुही माजवणाऱ्या समाजघटकांना फटकारले.
    एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून १५ एप्रिलपासून ‘या’ मार्गांवर धावणार जादा बसेस, असे आहे नियोजन
    ‘सध्या महाराष्ट्रात काही बरे चाललेले नाही. कुणाच्या हातामध्ये तांबडा, कुणाच्या हातात हिरवा, तर कुणाच्या हातात भगवा झगा आहे. प्रत्येक जण आपल्या महापुरुषांना आणून त्यात बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. इतिहास कुणाचा गुलाम नाही. सध्या लोक एक तर टोकाचे हिंदुत्ववादी किंवा टोकाचे पुरोगामी झाले आहेत. या दोन्ही भूमिकांतून इतिहासाकडे न्यायाने पाहता येणार नाही,’ अशा कानपिचक्या पाटील यांनी दिल्या.
    Ajit Pawar: सोबतीचा फायदा कळलाच असेल, रात्री २ वाजता फॉर्म, अजितदादांनी बनसोडेंच्या उमेदवारीचं गुपितच फोडलं
    ‘पुण्यातील जोग मंडळींनी रायगडावर रोप-वे बांधल्यानंतर सगळे पुढारी रायगडावर जायला लागले. त्याआधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री झालेले साबीर शेख हेच एकमेव रायगडावर जायचे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाचा गौरव करणाऱ्या आजच्या तरुणाईने राजांचे किमान दहा किल्ले चढून-उतरून पाहावेत. त्याशिवाय गौरव करण्याचा अधिकार त्यांना नाही,’ असा सल्ला त्यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘संभाजीराजांपासून आपल्या पित्याच्या महानिर्वाणाची बातमी लपविण्यात आली. दरबारातील काही मराठा आणि ब्राह्मण स्वकीयांविरोधात त्यांना लढावे लागले.’

    सरसेनापती पिलाजीराव जाधव यांचे वंशज समीर जाधव यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, स्मिता पाटील, डॉ. अर्चना जोशी, शिरीष सुमंत उपस्थित होते. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले.
    भारतीय मच्छिमाराने पाकमध्ये संपवलं जीवन; शिक्षा पूर्ण होऊनही सुटका न झाल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल
    संभाजीराजांनी मुंबईसाठी केला होता करार
    ‘मराठी नाटककारांनी संभाजी महाराजांची प्रतिमा कलुषित केली. मात्र, तेव्हा फारसे संशोधन झाले नव्हते. ऐकीव माहितीवरून ही नाटके लिहिली गेली. संभाजी महाराजांनी स्त्रिया आणि मुलींची विक्री रोखली. मुंबईचे महत्त्व त्यांनी त्या काळी ओळखले होते. मुंबई खरेदी करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरसोबत करार केला होता. मात्र, ब्रिटिशांनी गव्हर्नरला सांगितले,‘तुम्ही काय मूर्खपणा करीत आहात. संभाजी महाराजांच्या ताब्यात मुंबई दिली, तर हिंदुस्थानचा संपूर्ण पश्चिम किनारा त्यांच्या ताब्यात जाईल,’ असा दाखला देऊन पाटील यांनी संभाजीराजांची थोरवी सांगितली. ‘संभाजीराजांसोबत मृत्यूच्या महामंदिरात येथील रजपूत, मराठा, ब्राह्मण यापैकी कोणी गेले नाही, तर दूरच्या कवी कलशांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली,’ याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *