Ratnagiri Accident News: एक होतकरु शेतकरी, यशस्वी आंबा व्यवसायिक असलेल्या एका तरुणाच्या अकाली एक्झिटने संपूर्ण परिसरात अकच खळबळ माजली आहे. या तरुणाच्या लग्नाला फक्त एक महिना झाला असल्याची माहिती आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणाचे नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असे असून, तो नाखरे येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका चारचाकी इको गाडीशी जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडला.
चंद्रवदन हा एक हसतमुख चांगल्या स्वभावाचा तरुण असल्याचं त्याचे मित्र सांगतात. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता. त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि नुकतेच महिन्याभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. अशा अचानक त्याच्या जाण्याने त्याची नवविवाहित पत्नीला मोठा धक्का बसला आहे. लेकाचं लग्न झाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. मात्र, या घटनेने त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

