• Tue. Mar 10th, 2026

    GBS ची लागण, चिमुकली दीड महिना व्हेंटिलेटरवर, मृत्यूसोबतची झुंज अखेर यशस्वी

    GBS ची लागण, चिमुकली दीड महिना व्हेंटिलेटरवर, मृत्यूसोबतची झुंज अखेर यशस्वी

    जीबीएस अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजारावर अकरा वर्षीय बालिकेने मात केली आहे. .जवळपास दोन महिन्यांच्या उपचारानंतर अखेर 24 मार्च रोजी या बालिकेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महेश पाटील, नंदुरबार: जीबीएस (GBS) अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजार राज्यात पसरत असताना नंदुरबार जिल्हा जीबीएसमुक्त झाला आहे.अकरा वर्षीय बालिकेने जीबीएसवर मात केली आहे.जवळपास दोन महिन्यांच्या उपचारानंतर अखेर २४ मार्च रोजी या बालिकेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने आई-वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

    सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील हनुखांब अकरा वर्षीय बालिका सोनिया रवींद्र वसावे हिचे आई वडील परराज्यात ऊस तोडीसाठी गेले होते.सोनिया या बालिकेला २३ जानेवारी २०२५ रोजी अचानक अशक्तपणा जाणवू लागला. सुरुवातीला तिला चालता येत नव्हतं. सायंकाळी तिची तब्येत अजूनच बिघडली. तिला बसता आणि हात उचलताही येत नव्हतं. त्यामुळं तिला शेजाऱ्यांनी मुलगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला २५ जानेवारी रोजी नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

    वैद्यकीय महाविद्यालयात सोनियाची तपासणी करण्यात आली. अहवालात जीबीएस असल्याचं निदान झालं. त्यानंतर लगेचच तिला आयव्हीआयजीजी सुरू करण्यात आले. परंतु, आजार वेगानं वाढत गेला. त्यानंतर श्वसनासह स्नायूंना त्रास होऊ लागला. संध्याकाळपर्यंत मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. जवळपास दीड महिना ती व्हेंटिलेटरवर होती. मात्र, योग्य उपचारानंतर व्हेंटिलेटरचा आधार काढून टाकण्यात आला. १ आठवड्याआधी ट्रेकिओस्टोमी बंद करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोनियाला डिस्चार्ज देण्यात आला.मुलीला सुखरुप बघून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

    जीबीएस हा एक जीवघेणा आजार आहे. तो थेट शरीराच्या नसांवर परिणाम करतो. आजाराची लागण झाल्यावर स्नायू कमकुवत होऊ शकतात, वेदना होऊ शकतात आणि चेहरा, छाती, पाय आणि गिळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्नायूंना तात्पुरता अर्धांगवायूही होऊ शकतो. छाती आणि गिळण्याच्या स्नायूंना अर्धांगवायू झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, गुदमरणे आणि उपचार न केल्यास मृत्यू होऊ शकतो. या सिंड्रोमची बहुतेक मुले कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरी होतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर काही आठवड्यांतच जीबीएस सुरू होतो.

    जीबीएस होऊ नये म्हणून काय करावे?

    • नियमितपणे हात धुण्याची सवय आवश्यक, विशेषतः जेवणापूर्वी आणि आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर
    • रोगाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी बाहेरील अन्नपदार्थ सेवन टाळा.
    • हवामान बदलते तेव्हा स्वतःची काळजी घ्या. त्यामुळे तुम्हाला विषाणूजन्य संसर्गाचा त्रास होणार नाही. कारण विषाणूजन्य संसर्ग झाल्यानंतरही हा रोग पसरू शकतो.
    • रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध असा आहार घ्या.
    • चांगली झोप घेणे. चांगली झोप घेतल्याने शरीराची संरक्षण प्रणाली चांगली कार्य करते, ज्यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते.
    • नियमित व्यायाम करा. त्यामुळे मज्जासंस्थेचे आरोग्य सुधारते.
    महेश पाटील

    लेखकाबद्दलमहेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये नंदुरबार प्रतिनिधी म्हणून कार्यरत. 2003 ते 2014 दरम्यान विविध वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून सुरुवात. त्यानंतर विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून प्रवास करीत मटा ऑनलाईन पर्यंत वाटचाल.राजकीय बातम्यांमध्ये विशेष हातखंडा, विशेष स्टोरी शोधण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed