• Mon. Mar 16th, 2026
    ‘ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती…’ गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर बोचरा वार

    Gulabrao Patil Criticize Uddhav Thackeray : चाळीसगावातील शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे.

    Lipi

    निलेश पाटील, जळगाव : आम्ही तत्त्वांशी कधीच फारकत घेतली नाही. ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रात कशी आहे, ते आपल्याला माहितच आहे. अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. ते चाळीसगावातील शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच आपण हिंदू आहे, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ‘या निवडणुकीत लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. हे शिवसेनाप्रमुख यांच्या तालमीतले कार्यकर्ते नाहीत, यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. पण आम्ही शिवसेनेशी गद्दारी केली नाही, तर भगव्यासोबत निष्ठा राखली आहे.’ तर ‘एवढेच नव्हे तर लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती व आमचे सरकार सत्तेत आलेच नसते,’ असेही गुलाबराव पाटलांनी नमूद केले.
    Maharashtra Politics : उत्तमराव जानकर यांनी अजित पवारांची भेट का घेतली? मोठं कारण आलं समोर
    पाटील पुढे म्हणाले, ‘रक्ताचं पाणी करून आम्ही शिवसेना वाढवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगायचे त्या आदेशाचे आम्ही पालन करायचो. ज्यादिवशी आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची युती केली. त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की आम्हाला उठाव करायचा आहे. त्यावेळी आम्ही सुरत गुवाहाटीमार्गे उठाव केला व अडीच वर्ष महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी दमदार काम केल्यामुळे महायुतीच्या २७७ जागा आल्या आहेत.

    जिल्ह्यात विरोधकांचा एकही आमदार लोणचं घालण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. आम्ही शो पीस आमदार नाही. जनतेसाठी कधीही आमचे दरवाजे खुले असतात, असे म्हणत पाटलांनी ठाकरेंनी डिवचले आहे.

    ‘मी सहज मंत्री झालो नाही. मी निवडून येईल का नाही, याचीही मला शाश्वती नव्हती. आमच्या शिवसेना प्रमुखांचं म्हणणं हेच होतं महाराष्ट्रामध्ये मराठी, महाराष्ट्राच्या बाहेर आपण हिंदू म्हणून काम करू. आपण हिंदू आहे याचा आपल्याला अभिमान आहे. हिंदुस्थानामध्ये राहतो, जो हिंदू महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी. या भरवशावर शिवसेना वाढली आणि त्याच माध्यमातून एकनाथ शिंदे काम करत आहे.’ असेही पाटील म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *