महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर जळगाव्या चोपडा तालुक्तील उमर्टी गावात कारवाईसाठी गेलेल्या पथकावर शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने हल्ला केला. या जमावाने तीन पोलिसांना मारहाण केली. यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केलं. या प्रकरणी जळगाव पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांनी योग्य पावलं उचलत अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली.
महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर जळगाव्या चोपडा तालुक्तील उमर्टी गावात अवैध शस्त्र बनवून त्याची विक्री सुरु होती. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी 7 पोलिसांचं पथक गेलं होतं. यामध्ये एक पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश होता. पोलिसांनी सापळा रचत आरोपी पप्पी सिंगला अटक केली. पोलीस आरोपीला घेऊन परतत असतानाच आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन जाण्यास मज्जाव केला. यावेळी 100 ते 150 जणाच्या जमावाने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. यासाठी या जमावाकडून हवेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला पोलिसांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर जमावाकडून पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला.
पोलीस पथक जमावाच्या हल्ल्याचा प्रतिकार करत होतं. पण याचवेळी जमावाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्यासह किरण पारधी, शशिकांत पारधी यांना पकडलं. या तीनही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जामावाने बेदम मारहाण केली. तसेच जमावाने पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांचं अपहरण केलं. हा जमाव शशिकांत पारधी यांना मध्य प्रदेशात सीमाभागात जंगलात घेऊन गेला होता. यानंतर जळगाव पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने शशिकांत पारधी यांची सूटका केली.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
या घटनेवर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालं होतं पण जळगावच्या एसपींनी आणि मध्य प्रदेश पोलिसांनी त्याची तात्काळ सुटका केली. उमर्टी हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर गाव आहे. तिथे सिकवाल आणि इतर समाजाचे लोक राहतात. तिथे पिस्तूल तयार करण्याचा धंदा मध्य प्रदेशात चालतो. त्या लोकांनी पोलिसांवर आरोपी आणत असताना हल्ला केला होता. काही पोलीस हे निघून आले तर एक पोलीस त्यांना सापडला. त्यांनी त्याचं अपहरण केलं होतं. पण एसपींनी आणि मध्य प्रदेश पोलिसांनी तात्काळ त्याची सूटका केली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
मोठी बातमी! मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेवर माहिती दिली. “आरोपीला आपण पकडलं होतं. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपला पोलीसही सोडवला आहे. आपण मध्य प्रदेश पोलिसांना सांगितलं आहे की, अशाप्रकारे अवैध धंदे तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा आमच्यावरही परिणाम होत आहे. शेवटी जे शस्त्र बनतात ते आपल्याकडेही बनतात. त्यामुळे को-ऑर्डिनेशनचं काम सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस म्हणाले.

