• Fri. Aug 7th, 2026
    समलिंगी विवाहावर कायदा हवा, समाजालाही तयार करावं लागेल, भागवतांचं मत; अमृता फडणवीस म्हणतात या पिढीत स्वप्नपूर्तीची क्षमता

    Mohan Bhagwat IIMUN Speech : ‘तरुणांच्या तक्रारी खऱ्या असून त्यांना ‘देशविरोधी’ म्हणून दूर लोटू नये. ते आपलेच आहेत, या भावनेतून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’ अशा भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘आजचे तरुण उत्तरे शोधत आहेत. त्यांना प्रेम, विश्वास आणि संवाद हवा आहे. ते केवळ विरोधासाठी आवाज उठवत नाहीत; व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रश्न विचारत आहेत. तरुणांनी मतप्रदर्शन करणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे’, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी मांडली. ‘आयमन’ या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिषदेत मोहन भागवत यांनी ‘जेन-झी’ व ‘जेन-अल्फा’ पिढीशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

    मत मांडणे लोकशाहीसाठी आवश्यक

    आंदोलनांच्या संदर्भात सरसंघचालकांनी लोकशाहीतील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘लोकशाहीत आंदोलन हा संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे. संवाद थांबला की, संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे तरुणांनी प्रश्न विचारणे आणि मत मांडणे हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे’, असे ते म्हणाले. ‘तरुणांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना ‘देशविरोधी’ म्हणून दूर लोटू नये. ते आपलेच आहेत, या भावनेतून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असेही भागवत यांनी नमूद केले.

    शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी देशात सुमारे दहा लाख शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा उल्लेख केला. ‘शिक्षण ही प्रत्येकाच्या आयुष्याची गरज आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. शिक्षणावरील खर्च सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या सहा टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी योग्य आहे’, असे भागवत म्हणाले.

    Maharashtra TimesNagpur Crime : सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, गुप्तांगात जखमा, ‘इन्स्टा फ्रेण्ड’ आरोपीला लॉकअपमध्येही मऊसूद बेड हवा

    समलिंगी विवाहांवर कायदा हवा

    सोशल मीडियावरील ध्रुवीकरण आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत त्यांनी सावधगिरीचा सल्ला दिला. ‘सोशल मीडियावर अनेकदा खोटी माहिती पसरवली जाते. त्यामुळे तिथे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वतःचा विवेक वापरा आणि माहितीची पडताळणी करा. समाज ज्या मूल्यांना स्वीकारतो, त्याच आधारावर कायदे प्रभावी ठरतात. त्यामुळे समाजात चांगले आदर्श उभे राहणेही महत्त्वाचे आहे’, असे सरसंघचालक म्हणाले.समलिंगी विवाहाच्या प्रश्नावर त्यांनी समाजाच्या तयारीचा मुद्दा उपस्थित केला. ‘अशा विषयांवर कायदा करण्याबरोबरच समाजालाही तयार करावे लागेल’, असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या भूमिकेबाबत बोलताना स्त्री आणि पुरुष समान असून एकमेकांना पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.

    ‘देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता’ : अमृता फडणवीस

    ‘आजची युवा पिढी भविष्यातील मोठी शक्ती आहे. देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता या पिढीत आहे. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने नेण्यासाठी जेन-झी आणि जेन-अल्फाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तरुणाईचा विचार, दृष्टिकोन आणि अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे’, असे मत अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. सरसंघचालकांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, अनुभवी व्यक्तींनी आपले अनुभव नव्या पिढीसमोर मांडून त्यांना प्रगतीसाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. तरुणांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक बळ सरकार आणि विविध संस्था एकत्रितपणे देऊ शकतात.’

    Maharashtra TimesKerala Flood : बाबांच्या चेहऱ्यावरचं कापड काढा ना, शेवटचं पाहायचंय; पुरातून शेतकऱ्याला वाचवताना बाप गेला, मुलांची आर्त विनवणी ऐकून सीएमही गहिवरले

    ‘संवाद आवडला; पण काही उत्तरे अनुत्तरितच’

    मोहन भागवत यांच्या संवादानंतर उपस्थित तरुणांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गुजरातहून आलेला १५ वर्षीय चिरायू पंजारकर म्हणाला, ‘काही मुद्द्यांवरील भूमिका पटल्या; मात्र काही उत्तरे राजकीय वाटली. जेन-झीविषयी आज संवाद होत आहे, पण दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तरुणांवर लाठीमार झाला, तेव्हा असा संवाद का झाला नाही, हा प्रश्न कायम आहे.’ दिल्लीची अर्णा मित्तल हिनेही मुलाखतीबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘मुलाखतकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले; मात्र काही उत्तरे थेट नव्हती. शिक्षणावर सहा टक्के खर्चासारख्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या, तरच त्या भूमिकांवर विश्वास बसेल. मुलाखत स्क्रिप्टेड होती की, नाही हे सांगता येणार नाही. मात्र, प्रत्यक्ष कृतीतूनच त्याचे उत्तर मिळेल’, असे ती म्हणाली. उपस्थित काही विद्यार्थ्यांनी भागवत यांनी संवाद साधण्याचा आणि तटस्थ राहण्याचा प्रयत्न केल्याचे मान्य केले. मात्र, अनेक संवेदनशील प्रश्नांवर अधिक स्पष्ट आणि थेट भूमिका अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा