Silk Farming In Maharashtra: मागील नऊ महिन्यांमध्ये एकूण १९० कोटी रुपये मूल्याचे तूती रेशीम उत्पादित करण्यात आले. आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत यात किमान ५० ते ६० कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.
हायलाइट्स:
- राज्यातील शेतकऱ्यांचा रेशीमशेतीकडे वाढता कल
- मागील नऊ महिन्यांमध्ये १९० कोटींचे तूती रेशीम उत्पादन
- सध्या एकूण २० हजार ६३० एकरावर रेशीमशेती
राज्य सरकारकडून वस्रोद्योग विभागाच्या नियंत्रणाखाली रेशीम संचालनालय कार्यरत असून, या माध्यमातून राज्यातील अधिकाधिक क्षेत्रावर रेशीमशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते आहे. याचीच परिणती म्हणून गेल्या काही वर्षांत या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात १३ हजार ३० शेतकऱ्यांनी तुती रेशीमची शेती केली, तर वर्ष २३-२४मध्ये ही संख्या वाढून १७ हजार ५२१ झाली. डिसेंबर २०२४पर्यंत ती १९ हजार १३४वर पोहोचली आहे.
वाढत्या शेतकऱ्यांसोबतच रेशीमशेतीखाली येणाऱ्या जमिनीचे क्षेत्रही वाढत आहे. वर्ष २०२२-२३मध्ये राज्यातील एकूण १३ हजार ८३५ एकर जमिनीवर रेशीमशेती सुरू होती. डिसेंबर २४ अखेरपर्यंत हे क्षेत्र २० हजार ६३० एकरपर्यंत पोहोचले. ‘शेतकऱ्यांचा रेशीमशेतीमधील वाढता सहभाग हे चांगले लक्षण असून, एकात्मिक शेतीच्या माध्यमातून पारंपरिक आणि रेशीमशेतीसारखी अपारंपरिक शेती असे संतुलन राखून शेतकऱ्यांच्या खिशात पैसाही राहू शकतो,’ असे वस्त्रोद्योग विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
बीड जिल्हा आघाडीवर
राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये तुती रेशीमाचे उत्पादन होत असून, त्यात मराठवाडा विभाग आघाडीवर आहे. यातील सर्वाधिक क्षेत्र बीड जिल्ह्यात (५,७०० एकर) आहे. त्यापाठोपाठ धाराशीव (१,४४९ एकर) जिल्ह्यात आहे; तर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याचा (१,२६१ एकर) क्रमांक लागतो.
कर्तव्यभार पोलिसांसाठी जीवघेणा; मुंबई पोलिस दलात वर्षभरात सव्वाशे जणांचा ‘ऑन ड्युटी’ मृत्यू
राज्याची रेशीमभरारी
वर्ष रेशीम सुताचे उत्पादन मूल्य (रुपयांत)
२०२२-२३ ६०९.८० टन १८० कोटी
२०२३-२४ ७५४ टन २२० कोटी
एप्रिल २४-डिसेंबर २४ ५३५ टन १९० कोटी

