उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात जनता दरबार घेणारे मंत्री गणेश नाईक यांना भाजपनं मोठी ताकद दिली आहे. नाईक यांनी गेल्याच आठवड्यात कोपरी मतदारसंघात जनता दरबार घेतला.
राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. यातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तांना स्थगिती देण्यात आलेली आहे. भाजपनं मित्रपक्षांच्या वाट्याला गेलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री नेमत त्यांच्यावर वचक ठेवण्याची खेळी केलेली आहे. शिंदे यांच्याकडे ठाण्याचं पालकमंत्रिपद आहे. तिकडे भाजपनं गणेश नाईक यांच्यावर संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिंदेंना भिडणाऱ्या नाईकांना भाजप ताकद देत असल्याचं दिसत आहे.
भाजपचे नेते सतरा, मित्रपक्षांना खतरा? दादा, भाईंना धक्का देण्यासाठी नवा डाव; यादी समोर
वनमंत्री अससेले गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात ठाण्यात जनता दरबार घेतला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात येऊन ओन्ली कमळ म्हणत त्यांनी दर तीन महिन्यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं नाईक तयारीला लागले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाही.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं विळ्याभोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे. त्यामुळेच भाजपनं गणेश नाईक यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला मंत्रिपद देत ठाणे जिल्ह्यात पक्ष फ्रंटफूटवर राहील याची काळजी घेतली. आता पक्षानं त्यांना ठाण्याचं संपर्कमंत्रिपदही दिलं आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपची ताकद वाढवण्याची जबाबदारी नाईकांवर असेल. जिल्ह्यात भाजपचे ९, तर सेनेचे ६ आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पालिकांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात भाजपनं नाईकांकडे संपर्कमंत्रिपद सोपवणं अनेकार्थांनी महत्त्वाचं आहे.
शिंदेंना जोरदार झटका! बाळासाहेबांचा खास माणूस नाईकांच्या जनता दरबारात; अडचणी सुटल्याच नाहीत?
शिंदे मुख्यमंत्री असतानाही भाजपनं रविंद्र चव्हाण यांच्यामागे अशीच ताकद उभी केली होती. सार्वजनिक बांधकामसारखं महत्त्वाचं खातं देत भाजपनं चव्हाणांना ताकद दिली. त्यामुळे जिल्ह्यात भाजप मजबूत झाला. आता भाजपनं चव्हाण यांच्याकडे प्रदेशचं कार्यकारी अध्यक्षपद दिलं आहे. त्यामुळे नाईक आणि चव्हाण यांच्या माध्यमातून भाजप शिंदेंना ठाण्यात घेरत असल्याची चर्चा आहे.

