• Mon. Mar 16th, 2026
    राज्य सरकार विरोधात सुप्रियाताईंचा एल्गार! शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होम पिचवरुन आंदोलनाला सुरुवात

    Supriya Sule : कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर मिळावा म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती मधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी आज पडली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक पडकर, बारामती : मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर मिळावा म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती मधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी आज (७ जानेवारी) पडली.

    कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या आहेत. बारामतीतल्या तीन हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिय्या मांडला आहे. त्यांच्या समवेत युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत. गेल्या आठवड्यात सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण भागात दौरा केला होता यावेळी बहुतांश गावांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

    त्याचीच दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या होम पिचवर राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज प्रत्यक्षात खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. हाताला काळ्याफिती बांधून सुप्रिया सुळे यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. बळीराजाचे राज्य येऊ दे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेतकरी बचाव देश बचाव अशा विविध घोषणांनी आंदोलन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

    केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून कांद्याचे दर सातत्याने खाली येत आहेत. तसेच दूध दराबाबत देखील केंद्र व राज्य सरकारने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपेक्षाच केली आहे. दूध व्यवसायावर अनेक ग्रामीण तरुण सध्या अवलंबून आहेत. मात्र दुधाला कमी दर मिळत असल्याने ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती घटली आहे.

    परिणामी ग्रामीण भागातील अर्थचक्र थंडावले असून दुधाला रास्त दर मिळाला तर हे चक्र पुन्हा एकदा धावू लागेल. तसेच जिरायती व बागायती क्षेत्रामध्ये देखील शेतकरी कांदा लागवड करत असतात. मात्र कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे व्यापारी कांदा निर्यात करू शकत नाहीत. कांदा भारतीय बाजारात पडून राहिल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्षाच्या वतीने बारामती मधून जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे. या मोर्चाला दूध उत्पादक, शेतकरी, महिला, युवक व युवती यांनी हजर लावली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed