Ravindra Chavan: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या, तब्बल ९० चा स्ट्राईक रेट राखणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता राज्यात खांदेपालटाची तयारी सुरु केली आहे.
रविंद्र चव्हाण गेल्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. मात्र यंदा त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. तेव्हापासूनच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता रविंद्र चव्हाण यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्षांना असलेले अधिकार आता चव्हाण यांच्याकडे राहणार आहेत. त्यामुळेच तेच पुढील प्रदेशाध्यक्ष असतील, ही बाब स्पष्ट आहे.
बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा, हजारो नागरिक रस्त्यावर; CM फडणवीसांनी काढले २ महत्त्वाचे आदेश
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची राज्यात शतप्रतिशत सत्ता येईल, असं विधान गृहमंत्री अमित शहांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केलं होतं. त्यानंतर चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेली महत्त्वाची जबाबदारी सूचक मानली जात आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपनं चव्हाण यांना संधी दिली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकामसारखं तगडं खातं देण्यात आलं. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला शह देण्यासाठीच भाजपनं चव्हाण यांना ताकद दिल्याची चर्चा त्यावेळी झाली. चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचे आमदार आहेत.
ठाणे जिल्हा शिवसेनेला बालेकिल्ला मानला जातो. यंदा ठाण्यात शिवसेनेपेक्षा भाजपचे जास्त उमेदवार निवडून आले आहेत. सध्या ठाण्यात शिवसेनेचे ६, तर भाजपचे ९ आमदार आहेत. विधानसभेला ९ जागा निवडून आणणाऱ्या भाजपनं आता ठाण्यातल्याच चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदी आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात चव्हाण ठाण्यात सेनेच्या नाकीनऊ आणू शकतात. भाजपनं संधी मिळताच अनेक ठिकाणी शिवसेनेवर कुरघोडी केलेली आहे. आता प्रदेशाध्यक्षच ठाण्याचा करुन भाजपनं शिंदेंना थेट शह देण्यास सुरुवात केली आहे.
उल्लेख केवळ आमचा का? धसांबद्दल स्पष्टच बोलली प्राजक्ता; ‘तिथे’ कोण कोण होतं? सगळं सांगितलं
रविंद्र चव्हाण २००७ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपचे नगरसेवक असलेले चव्हाण स्थायी समितीचे सभापती झाले. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. २०१५-१६ मध्ये कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल महापालिकेत भाजपनं चांगलं यश मिळवलं. त्यानंतर चव्हाण यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं.
२०१९ मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले. २०२२ मध्ये राज्यात शिवसेना, भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर ते शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी-सिंधुदर्ग, पालघरची जागा भाजपला जिंकून दिली. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का देत त्यांनी भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आणला.

