• Wed. Mar 18th, 2026

    महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव

    महायुतीमधील ‘हा’ नेता उद्धव ठाकरेंचा भरवशाचा सहकारी, संजय राऊतांनी सांगितलं नाव

    Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भरवशाच्या नेत्याचं नाव पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे हा नेता महायुतीमध्ये असल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. संजय राऊत यांनी कोणाचं नाव घेतलं जाणून घ्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची आज देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. त्यासोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामधील राष्ट्रवादीचे नेते आणि अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची सहाव्यांदा शपथ घेतीली. अजित पवारांच्या या रेकॉर्डची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. यामध्ये पहाटेच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित दादांचे अभिनंदन करत दादांसाठी उपमुख्यमंत्रिपदाचे आरक्षण कायम झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

    अजित पवार यांचं मी अभिनंदन करतो, सहावेळा उपमुख्यमंत्री, नो ब्रेक, जणू काय त्यांच्यासाठी त्या पदासाठी आरक्षण कायम झालेलं आहे. हे आरक्षण ठेवण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंचंही आहे. अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी खूप चांगलं आणि उत्तम सहकारी म्हणून काम केलं. उद्धव ठाकरे नेहमी त्यांचे कौतुक करतात, मंत्रिमंडळातील भरवशाचा सहकारी म्हणून आजही अजित पवार यांचा नामोल्लेख करतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    गेल्या अडीच-तीन वर्षामध्ये महाराष्ट्राची लूट झाली, महाराष्ट्राचे उद्योग, महाराष्ट्राची संपत्ती, सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर दरोडे पडले. आता दरोडेखोरी थांबवून वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांना चांगला मुख्यमंत्री म्हणून नोंद ठेवेल, असंही संजय राऊत म्हणाले.

    शिंदेंची गरज संपली आता त्यांना फेकून दिलं आहे. शिंदे महाराष्ट्रात कधी मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजप शिंदेंचा पक्षही फोडू शकतात. कारण भाजप कायम त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाला संपवते. बहुमत असून पंधरा दिवस सरकार बनवलं नाही याचा अर्थ महायुतीमध्य काहीतरी गडबड आहे. उद्यापासून यांच्यातील गडबड समोर येणार आहे. हे सगळे महाराष्ट्र किंवा देशाच्या हितासाठी एकत्र आलेले नसून स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र येत सरकार चालवण्याची भाषा करत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed