Maharashtra Chief Minister Oath Ceremony: शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
हायलाइट्स:
- पाच हजारहून अधिक पोलिस तैनात
- एसआरपीएफ, जलद कृतीदल, दंगलनियंत्रण पथकाची कुमक
- सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन
शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता कार्यक्रमादरम्यान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ उपायुक्त, २९ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ५२० अधिकारी आणि साडेतीन हजार कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी ‘एसआरपीएफ’च्या प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगलनियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बॉम्बशोधक व नाशक पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या सर्व रस्त्यांवर बुधवारपासूनच पोलिस दिसत होते.
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
कोणताही गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी शपथविधी सोहळयासाठी ठिकाणी येणाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद व्यक्ती, बेवारस वस्तू आढळल्यास त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी, तसेच आवश्यक प्रसंगी नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी पोलिस हेल्पलाइन क्रमांक १००, ११२ येथे संपर्क साधावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?
सार्वजनिक वाहतुकीच्या वापराचे आवाहन
आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शपथविधी कार्यक्रमाकरिता येणाऱ्या जनसमुदायाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, विशेषतः रेल्वेचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. आझाद मैदान तसेच आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, ३० अधिकारी आणि २५० कर्मचारी वाहतूक नियमनासाठी तैनात असतील. या परिसरातील काही मार्ग आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

