• Sat. Sep 21st, 2024
बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट

वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव नाईक होते. तिकीट मागताना पुंडलिकराव गवळींनी बाळासाहेबांसमोर एकच अट ठेवली होती ते म्हणजे तुम्ही मतदारसंघात एक सभा घ्या आणि मी काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त करतो अशी ती अट होती. बाळासाहेबांनी सभा घ्यायचं ठरवलं. जोरदार सभा झाली आणि पुंडलिकराव गवळींनी विजय मिळवला.

चक्क महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला पाडलं यापुढे सुरू झाली ती गवळी कुटुंबाच्या एकहाती राजकारणाची स्टोरी. आधी वडील आणि नंतर मुलीने मतदारसंघात एकहाती वर्चस्व राखलं. पुंडलिकराव गवळी यांनी सुधाकरराव नाईक यांचा पराभव केल्यानंतर ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला परिचित झाले. पण पुढे दोन वर्षातच म्हणजे १९९८ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांचं तिकीट कापलं आणि डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे यांना संधी दिली. शिवसेनेला या निर्णयाचा पश्चात्ताप होईल असाच निकाल आला. सुधाकरराव नाईक यांचा विजय झाला आणि शिवसेनेचा उमेदवार पडला.

भावना गवळी यांचा राजकीय प्रवास

यानंतर एक वर्षातच मध्यावधी निवडणूक झाली आणि यावेळी राजकारणात एंट्री झाली ती भावना गवळींची. खरं तर १९९९ चे तिकीट हे पुंडलिकराव गवळी यांच्यासाठीच बाळासाहेबांनी दिलं होतं पण त्यांनी यावेळी मुलीला संधी द्यायचं ठरवलं. भावना गवळी लोकसभेच्या प्रचारात उतरल्या. तरुण उमेदवार असल्यामुळे एकीकडे उत्साह होता आणि प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष चालू होता. सोनिया गांधींच्या विदेशी असण्यावर आक्षेप घेऊन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी राष्ट्रवादीची स्थापन केली. भावना गवळी यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार होते याच मतदारसंघाचं पूर्वी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार अनंतराव देशमुख. तर राष्ट्रवादीने औरंगाबादचे जावेद खान यांना उमेदवारी दिली.

काँग्रेसच्या मतांचं विभाजन झालं आणि भावना गवळी पहिल्यांदा निवडून आल्या. भावना गवळी यांना २ लाख ४४ हजार ८२० मतं मिळाली. काँग्रेसचे अंतराव देशमुख यांना २ लाख ५ हजार २२५ आणि राष्ट्रवादीच्या जावेद खान यांना जवळपास दीड लाख मतं मिळाली. ३९ हजार मतांनी भावना गवळी निवडून आल्या यावेळी त्यांचं वय होतं फक्त २६ वर्षे होते. इथूनच त्यांच्या राजकारणाची खरी सुरुवात झाली.

एकनाथ खडसे हे फडणवीसांच्या हृदयात, भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे काय म्हणाले?
२००४ च्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा भावना गवळी यांना उमेदवारी दिली. काँग्रेस -राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. तत्कालीन मंत्री मनोहरराव नाईक यांना उमेदवारी दिली गेली. दरम्यानच्या काळात भावना गवळींच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा या मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील जास्त गावांचा समावेश होता, तर यवतमाळमधील फक्त पुसद तालुक्यातील गावं होती, पाच वर्षाच्या काळात भावना गवळी यांचा जनसंपर्कही वाढला होता. भावना गवळींच्या प्रचारासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरेंची मोठी सभा वाशिममध्ये झाली. या निवडणुकीत बंजारा विरुद्ध पाटील या वादाचीही किनार होतीच त्याचाही फायदा भावना गवळींना झाला आणि त्या पुन्हा निवडून आल्या. यावेळी त्यांना साडे तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आणि त्यांनी ६० हजार मतांच्या फरकाने मनोहर नाईकांचा पराभव केला.

२००९ च्या निवडणुकीपूर्वी लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. वाशीम हा यवतमाळ मतदारसंघाला जोडला गेला आता यवतमाळ जिल्ह्यातील गावांची संख्या या मतदार संघात जास्त होती. शिवसेनेकडून भाजप युतीमुळे भावना गवळी यांनाच पुन्हा उमेदवारी दिली गेली. भाजपचे या मतदारसंघाचे तत्कालीन खासदार हरिभाऊ राठोड हे भाजप सोडून काँग्रेसकडे गेले आणि उमेदवारी मिळवली. २२ जुलै २००८ रोजी अनु करारवरून मनमोहन सिंग सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता यावेळी हरिभाऊ राठोड यांनी पक्षाचा आदेश धुडकावत सरकारच्या बाजूने मतदान केलं. तेव्हा काँग्रेस सरकारने अवघ्या १९ मतांनी विश्वास प्रस्ताव जिंकला. त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांना ही उमेदवारी देण्यात आली.

मात्र, लोकसभेत मतदानासाठी फुटलेल्या खासदारांनी कोट्यवधी रुपये घेतल्याचे स्टिंग ऑपरेशन झाले. संसदेतही पैशाने भरलेल्या बॅगा विरोधी पक्षाने सादर केल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम हरीभाऊ राठोड यांच्या प्रतिमेवर झाला. भाजपही राठोडांना दोषी ठरविण्यासाठी जिद्दीने पेटली होती. याउलट भावना गवळी बहुतांश मतदारांसाठी नवख्या होत्या त्यांची प्रतिमा स्वच्छ होती. पुन्हा एकदा त्यांना बंजारा विरुद्ध पाटील या जातीय समीकरणाचा फायदा झाला आणि त्या तिसऱ्यांदा खासदार झाल्या. भावना गवळींना ३ लाख ४४ हजार ४३४, तर हरिभाऊ राठोड यांना ३ लाख २४ हजार ७९२ मते मिळाली. सलग तिसऱ्यांदा भावना गवळींनी शिवसेनेचा झेंडा फडकवला.

भाजप कार्यकर्त्यांचा तक्रारीचा पाढा, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय खासदाराला बावनकुळेंची समज
पुढे २०१४ भावना गवळींचं निवडून येणं कठीण दिसत होतं. अँटी इन्कम्बन्सी होती पण मोदी लाट आली आणि यावेळीही त्या तरल्या. काँग्रेसने शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी दिली होती पण भावना गवळींनी जवळपास एक लाखाच्या फरकाने विजय मिळवला आणि चौथ्यांदा खासदार झाल्या. २०१९ च्या निवडणुकीतही भावना गवळींनाच शिवसेनेचं तिकीट मिळालं. संजय राठोड हे या मतदारसंघात इच्छुक होते त्यांचे भावना गवळींशी खटकेही उडाले पण भावना गवळी सगळ्यांवर भारी पडल्या आणि निवडून आल्या. पाच वेळा खासदार राहूनही जेव्हा केंद्रात शिवसेनेला मंत्रिपद मिळालं तेव्हा भावना गवळींना डावललं. ईडीची पिडा मागे लागली तेव्हाही पक्षाने साथ न दिल्याची खंत मनात होती. अखेर भावना गवळींनीही बंडाचा झेंडा फडकवला आणि त्या शिंदे गटात गेल्या.

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा हे सांगणाऱ्या भावना गवळी शिवसेनेच्या पहिल्या खासदार होत्या. आता भावना गवळी आणि त्यांचे पक्षातलेच विरोधक संजय राठोड हे दोघेही शिंदे गटात आहेत. २०२४ साठी उद्धव ठाकरेंना या मतदारसंघात भक्कम पर्याय शोधावा लागणार आहे. वाशिम-यवतमाळ संघात उद्धव ठाकरे भावना गवळींना तोडीस तोड पर्याय शोधू शकतील का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed